“४ महिन्यात २ हजार कोटींच्या वसुलीप्रकरणी ठाकरे सरकारचे १२ मंत्री CBI च्या रडारवर”; खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 18:00 IST2021-04-29T17:59:07+5:302021-04-29T18:00:33+5:30
भयभीत झालेल्या सरकार मधील मंत्री सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहात असल्यानं रश्मी शुक्ला, सचिन वाझे, परमवीर सिंग प्रकरणावरून ठाकरे सरकारनं प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

“४ महिन्यात २ हजार कोटींच्या वसुलीप्रकरणी ठाकरे सरकारचे १२ मंत्री CBI च्या रडारवर”; खळबळजनक दावा
कल्याण - ठाकरे सरकार सध्या भयभीत झाले आहे.. येत्या चार महिन्यात २ हजार कोटींच्या वसुलीप्रकरणी या सरकारमधील अर्धा डझन बडे नेते सीबीआयच्या दारात उभे असतील असा खळबळजनक दावा भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते गुरुवारी कल्याणात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, भयभीत झालेल्या सरकार मधील मंत्री सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहात असल्यानं रश्मी शुक्ला, सचिन वाझे, परमवीर सिंग प्रकरणावरून ठाकरे सरकारनं प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा त्यांनी दिला आहे. राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन कमतरतेमुळे मृत्यूचे प्रमाण वाढलंय. रुग्णालयांना ५० टक्के ऑक्सिजन आणि २५ टक्के रेमडेसिवीरचा पुरवठा होतोय. त्यामुळे १२ एप्रिलनंतर मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
रेमडेसिवीर इंजेक्शनावरून लोकायुक्तांकडे तक्रार
रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या वेगवेगळ्या किंमत आणि सुरु असलेला भ्रष्टाचाराप्रकरणी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंध विभाग (एसीबी) येथे याचिका दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांनी याला ठाकरे सरकारचा कोव्हिड भ्रष्टाचार म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून एप्रिल २०२१ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने रेमडेसिवीर इंजेक्शन १५६८ रुपयांना खरेदी करण्याची ऑर्डर काढली, तसेच राज्याच्या आरोग्य विभागाने १३११ रुपये, हाफकिन इन्स्टिट्यूटने ६६५.८४ रुपये तर मीराभाईंदर महानगर पालिकेने ६६५.८४ रुपयांना विकत घेण्याची ऑर्डर काढली. मग या खरेदीच्या किंमतीत इतकी तफावत असल्याने यात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत याचिका लोकायुक्त आणि एसीबीकडे दाखल केली असल्याचे देखील सोमय्या यांनी सांगितले आहे.
२ हजार कोटी गेले कुठे?
'सचिन वाझे २००० कोटींची वसुली गँग प्रकरणात आता अनिल देशमुखांवर कारवाई होतेय. मंत्री अनिल परब यांचीही थोड्या दिवसात हीच स्थिती होईल. आणखी २ मोठे नेते लाभार्थी आहेत. २ हजार कोटी गोळा झाले. ते कुठे कुठे गेले? आता सीबीआय कारवाई करतेय. ईडी तपास करतेय. एनआयए आहे. पुढील काही दिवसांत आयकर विभागदेखील येईल. उद्धव ठाकरेंना २ हजार कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागेल,' असं सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.