उद्योगनगरीतील ‘बत्ती गूल’मुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले;उत्पादन ठप्प; मालाच्या पुरवठ्यास विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:19 IST2025-06-25T18:18:53+5:302025-06-25T18:19:53+5:30

- ऑर्डर रद्दची नामुष्की; कोट्यवधींचे नुकसान, अपुऱ्या मनुष्यबळामुळे महावितरणची दमछाक, जुनी आणि जीर्ण यंत्रणा बदलण्याची मागणी

pimpri chinchwad Small entrepreneurs are suffering due to the 'lightning crisis' in the industrial city | उद्योगनगरीतील ‘बत्ती गूल’मुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले;उत्पादन ठप्प; मालाच्या पुरवठ्यास विलंब

उद्योगनगरीतील ‘बत्ती गूल’मुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले;उत्पादन ठप्प; मालाच्या पुरवठ्यास विलंब

- गोविंद बर्गे

पिंपरी :
पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीला विजेच्या समस्यांचे ग्रहण लागले आहे. विजेच्या सततच्या लपंडावाने उत्पादन ठप्प होत आहे. ऑर्डर रद्दची नामुष्की, कामगारांच्या अतिरिक्त पगाराचा बोजा यामुळे लघुउद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. वीज समस्या सोडविताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे महावितरणची दमछाक होत आहे. लघुउद्योग टिकविण्यासाठी महावितरणची जुनी व जीर्ण यंत्रणा बदलण्याची मागणी संघटनांकडून केली जात आहे.

शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी, मोशी, चिखली आणि तळवडे एमआयडीसीत सुमारे १३ हजार लघुउद्योग आहेत. येथे टाटा मोटर्स, बजाज ऑटो, सँडविक एशिया, ॲटलास कॉप्को, थरमॅक्स, सेंच्युरी एन्कासह अन्य बहुराष्ट्रीय कंपन्यांना लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून येथील लघुउद्योजक वीज समस्यांनी हैराण झाले आहेत. दिवसभरात अनेकदा वीज गायब होते. कधी दिवसभर वीजपुरवठा खंडित होतो. या समस्यांबाबत लघुउद्योजकांच्या विविध संघटनांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही पाठपुरावा केला. मात्र, समस्या सुटलेल्या नाहीत.

वीज खंडित झाल्याने होणारे नुकसान

वीज खंडित झाल्यास उत्पादन प्रक्रिया ठप्प होते. कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. वेळेत मालाचा पुरवठा करण्यासाठी वेळप्रसंगी कामगारांना ओव्हरटाइमचा पगार द्यावा लागतो. मालाचा वेळेत पुरवठा न झाल्यास ऑर्डर मिळणे कठीण होते. कंपन्यांची विश्वासार्हता गमावण्याची वेळ येते. ऑर्डर रद्दची नामुष्की ओढवते. पुरवठादाराची संधी गमावण्याचा धोकाही असतो.

उद्योगनगरीतील लघुउद्योग

ऑटोमोबाइल, ॲक्सेसरीज, वाहनांचे सुटे भाग, रबर उत्पादन, फॅब्रिकेशन, विविध प्रकारचे प्लास्टिकचे साहित्य, अभियांत्रिकीतील सुटे भाग, टँकर, बॉयलर, यंत्र निर्मिती, अन्नपदार्थ प्रक्रिया, पॅकिंग, औषध निर्मिती, आरोग्य सेवा संबंधित उत्पादने व अन्य.

वीज समस्यांची प्रमुख कारणे

सुमारे ४० ते ५० वर्षे जुनी व जीर्ण वीज यंत्रणा, महावितरणचे अपुरे मनुष्यबळ, कंडक्टर आणि फिडरमधील मोठ्या अंतरामुळे वीज पुरवठ्यावर येणारा अतिरिक्त ताण, रस्ते खोदाईमुळे विद्युत केबलचे नुकसान, कायमस्वरूपी उपाययोजनांऐवजी तात्पुरती मलमपट्टी करण्याचे प्रकार.
 
या उपाययोजनांची गरज

महावितरणचे कंडक्टर, फिडर, ट्रान्सफॉर्मर, विद्युत तारा बदलाव्यात. दोन फिडरमधील अंतर कमी करावे. महावितरणकडून दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत. विद्युत खांबालगतच्या व विद्युत तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची नियमित छाटणी करावी.

विजेच्या वेळापत्रकाबाबत मतमतांतरे

महावितरणच्या म्हणण्यानुसार :
दर गुरुवारी देखभार-दुरुस्तीसाठी कामाचे स्वरूप पाहून वीजपुरवठा खंडित ठेवण्याचे वेळापत्रक तयार केले जाते.
उद्योजकांच्या म्हणण्यानुसार : हे वेळापत्रक सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच असे असते. इतर दिवशीही दिवसातून अनेकदा वीज खंडित होते.

मे महिन्यातील वादळी पावसामुळे ही समस्या निर्माण झाली होती. परंतु, सध्या अशा समस्या नाहीत. खास एमआयडीसीसाठी दर आठवड्याला विजेच्या समस्यांचा आढावा घेऊन त्या तत्काळ दूर करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जातात. - विकास पुरी, प्रभारी जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे परिमंडल.

वीजपुरवठा खंडित होण्याचा सर्वाधिक फटका लघुउद्योजकांना बसतो. ही समस्या सोडविण्यासाठी महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ऊर्जा मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला, तरीही समस्या सुटत नसेल तर न्याय मागायचा तरी कुणाकडे, हा प्रश्न पडला आहे. -संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना.

वीजपुरवठा खंडित झाल्यास प्लास्टिक उद्याेगांचे मोठे नुकसान होते. बॅरलमधील कच्च्या मालाची हानी होते. संपूर्ण शिफ्ट वाया जाते. त्यामुळे एका कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान होते. -योगेश बाबर, माजी अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड प्लास्टिक उद्योग संघटना.
 
वीजपुरवठा खंडित झाल्यास प्लास्टिक मोल्डिंग मशीनला साधारण दोन ते तीन तास प्री हिटिंगला जातात. दिवसभरातून चार-पाच वेळा वीज गेली तर पूर्ण दिवस मशीन बंद राहते. परिणामी उत्पादनावर परिणाम होतो. -नितीन नामदेव देवकर, लघुउद्योजक
 
तळवडे एमआयडीसीत दररोज चार ते पाचवेळा वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी उद्योजकांचे ३० ते ४० टक्के नुकसान होते. वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण अपयशी ठरत आहे. - गोरख भोरे, लघुउद्योजक, तळवडे एमआयडीसी.

Web Title: pimpri chinchwad Small entrepreneurs are suffering due to the 'lightning crisis' in the industrial city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.