Pimpari-chinchwad : बड्या धेंडांना लगेच नळजोड सामान्यांच्या पदरी हेलपाटेच; महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा विसंगत कारभार
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: March 13, 2026 16:32 IST2026-03-13T16:32:27+5:302026-03-13T16:32:43+5:30
- महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा विसंगत कारभार; अर्ज करूनही महिनोनमहिने प्रतीक्षा; कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे दिले जाते कारण

Pimpari-chinchwad : बड्या धेंडांना लगेच नळजोड सामान्यांच्या पदरी हेलपाटेच; महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा विसंगत कारभार
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील नळजोड प्रक्रियेत विसंगती असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना आणि बिल्डरांना अल्पावधीत नळजोड मंजूर होत असताना, स्वतःच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या सामान्यांना मात्र महापालिकेच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नवीन नळजोड मिळविण्यासाठी अर्ज केल्यानंतर फाइल विविध टेबलांवर फिरत राहते. कधी कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे कारण दिले जाते, तर कधी प्रत्यक्ष पाहणीच्या नावाखाली अर्ज महिनो-महिने प्रलंबित ठेवले जातात. परिणामी, साध्या नळजोडसाठीही नागरिकांना प्रभाग कार्यालयापासून मुख्यालयापर्यंत अनेकदा चकरा माराव्या लागत आहेत.
शहरातील मोठ्या बांधकाम प्रकल्पांच्या बाबतीत मात्र प्रक्रिया वेगाने पूर्ण होत असल्याचे दिसून येते. प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर थेट मुख्य जलवाहिनीतून जोडणी देण्याची प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे 'बिल्डरांना जलद नळजोड, तर सामान्यांना दिरंगाई' असा आरोप केला जात आहे.
कमी दाबाने पाणीपुरवठा
शहरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांत पाण्याचा दाब कमी होणे, पुरवठा अपुरा राहणे अशा तक्रारी वाढत असताना नळजोड प्रक्रियेत होणारी दिरंगाई नागरिकांच्या अडचणीत भर टाकत आहे.
नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज
प्रशासकीय राजवट संपल्यानंतर आता लोकप्रतिनिधी सत्तेत आले आहेत. त्यामुळे प्रलंबित असलेल्या नवीन नळजोडणीच्या प्रश्नाकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.
3 टँकरच्या पाण्यावर अवलंबून
अनेकांना पर्याय नसल्याने राहावे लागत असून त्यासाठी अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. नळजोडसारख्या मूलभूत सेवेतही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रक्रियेत पारदर्शकता आणून 3 अर्जावर निश्चित कालमर्यादेत निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अधिकाऱ्यांनी तक्रारींचे निवारण करणे गरजेचे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन नळजोडणीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी तक्रारींचे निवारण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पाहणीच्या नावाखाली अर्ज ठेवतात प्रलंबित
कधी कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे कारण दिले जाते, तर कधी प्रत्यक्ष पाहणीच्या नावाखाली अर्ज महिनोन्महिने प्रलंबित ठेवले जातात. नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात.