‘माळेगांव’वर ४२५ कोटींच्या कर्जाचा विरोधकांचा आरोप धादांत खोटा;अजित पवारांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 20:11 IST2025-06-02T20:10:30+5:302025-06-02T20:11:10+5:30

- निवडणुकीसाठी पार पडल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, पत्रकार परिषदेत गुरुशिष्यांवर केली टीका  

Opposition allegation of a loan of Rs 425 crore on Malegaon is false in Dhadant | ‘माळेगांव’वर ४२५ कोटींच्या कर्जाचा विरोधकांचा आरोप धादांत खोटा;अजित पवारांनी लगावला टोला

‘माळेगांव’वर ४२५ कोटींच्या कर्जाचा विरोधकांचा आरोप धादांत खोटा;अजित पवारांनी लगावला टोला

बारामती : विरोधक माळेगांव कारखान्यावर सत्ताधाऱ्यांमुळे ४२५ कोटींचे कर्ज असल्याचे धादांत खोटे बोलतात. ३१ मे अखेर आपल्याकडे २६९ काेटींची ७ लाख १९ हजार ४११ क्विंटल साखर शिल्लक आहे. बँकेची २२९ कोटी कर्ज फेड करून उपलब्ध होणारी रक्कम ४० कोटी रुपये आहे. यामध्ये इथेनाॅल पैसे वेगळे होतात, अशी परिस्थिती असताना विरोधक धादांत खोटे बोलतात, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी गुरुशिष्यांवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, माळेगांव कारखान्याच्या साखरेवर २२९ कोटींचे कर्ज आहे, तर २६९ काेटींची साखर शिल्लक आहे. त्यामुळे साखर विक्रीतून कर्ज वजा जाता ४० कोटी रुपये शिल्लक उरणार आहेत. कारखान्याने एफआरपी पेक्षा अधिक म्हणजे ३३३२ रुपये सर्वाधिक दर दिला.

अजूनपर्यंत महाराष्ट्रात कोणी दिलेला नाही. मात्र, कारण नसताना विरोधक ‘बाऊ’ करून सभासदांची दिशाभूल करतात. विरोधकांच्या काळात ऊस गाळप सुरू असताना उसाचा साखर उतारा १०.६१ होता, कारखान्यात ज्यूसमधून गळती होती. कारखाना आमच्या ताब्यात आल्यानंतर आम्ही तिथे ‘व्हीएसआय’ची टीम पाठवून अभ्यास करून होणारी रसाची गळती थांबविली. त्यानंतर आमच्या काळात साखर उतारा ११.४७ झाला. चांगल्या पद्धतीने आमच्या लोकांनी कारखाना चालविल्याचे पवार म्हणाले.

विरोधकांनी ३४०० रुपये भाव दाखविला. मात्र, प्रत्यक्षात ३२०० रुपये आणि काहीतरी वर भाव दिला. तो उर्वरित भाव आमच्या काळात देण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी ३४०० रुपये दर दिलाच नाही. माळेगावच्या इतिहासात २०२१ मध्ये उच्चांकी गाळप केल्याचे पवार म्हणाले. 

आठ टक्क्यांनी ऐच्छिक ठेव पतसंस्थेने ठेवल्यास बचत

विरोधकांनी पतसंस्थेतून पैसे काढल्याचा केलेला आरोप खोटा आहे. पतसंस्थेतून १ रुपयादेखील काढलेला नाही. आपल्या फार पूर्वीपासून कारखान्यात आठ टक्के व्याजाने ऐच्छिक ठेवी ठेवतात. बँकेचा व्याजदर १०.३० ते ११ टक्के आहे. यामध्ये तीन टक्के बचत होत असेल आणि काहींनी आठ टक्के व्याजाने ऐच्छिक ठेव ठेवल्यास यामध्ये काय तोटा आहे. ११ टक्क्यांनी बँकेचे पैसे घेण्यापेक्षा आठ टक्क्यांनी ऐच्छिक ठेव पतसंस्थेने ठेवल्यास काहीच बिघडले नाही, यामध्ये कारखान्याची बचतच होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

...तर सभासद ठरवतील

माळेगांव कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालकांवर विश्वास नसल्याने अजित पवार यांनी स्वत: अर्ज भरल्याचे विराधेक सांगतात. मी ‘ब‘वर्ग प्रतिनिधी आहे, मी काय करावं हा माझा अधिकार आहे. राज्यात अनेक नेते, आमदार, मंत्री, कारखान्याचे चेअरमन होते. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायचं काय कारणं? सभासद ठरवतील कोणाला निवडून द्यायचे ते असा टोला उपमुख्यमंत्री पवार यांनी लगावला.

कारखान्याच्या भल्यासाठी एकत्र लढण्याचा प्रयत्न

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुती धर्म पाळला. आता गरज संपल्यावर अजित पवार महायुती धर्म विसरले आहेत. कारखान्याच्या भल्यासाठी एकत्र लढण्याचा दिलेला प्रस्ताव त्यांनी फेटाळला. लोकसभा, विधानसभेत विरोधक चालतात. मग माळेगावला चालत नाहीत का ?, असे विरोधक म्हणतात. मात्र, अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव मला नव्हता. उलट माझ्याच बद्दल माझ्या विचाराचे लोक तिथं जायचे, तर तिथं सांगितलं जायचं, बघा हे आम्हाला भेटायला येतात, यामध्ये सर्वांना माहिती आहे, मी सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

राज्यात ९२ साखर कारखान्यांची ८६४ कोटी एफआरपी थकीत आहे. त्यापैकी २० कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई करून साखर ताब्यात घेण्यात आली आहे. त्यातून ती रक्कम देण्यात येणार आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री

Web Title: Opposition allegation of a loan of Rs 425 crore on Malegaon is false in Dhadant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.