शहरातील राष्ट्रवादीचा अजित पवार गट थंडच; विधानपरिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि शहराध्यक्ष योगेश बहल यांचे अपयश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:26 IST2025-06-11T09:25:19+5:302025-06-11T09:26:26+5:30
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शहरातील बहुसंख्य नगरसेवक अजित पवारांसोबत गेले होते. त्यानंतर वर्षभरातच या गटाला घरघर लागली. लोकसभा निवडणुकीनंतर या गटाला मोठे धक्के सोसावे लागले होते.

शहरातील राष्ट्रवादीचा अजित पवार गट थंडच; विधानपरिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि शहराध्यक्ष योगेश बहल यांचे अपयश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचा अजित पवार गट तुल्यबळ असून, पवारांची उद्योगनगरीवर विशेष मर्जी राहिली आहे. त्यांनी अण्णा बनसोडे यांच्या रूपाने विधानसभेचे उपाध्यक्षपदही शहराच्या पदरात टाकले. मात्र, बनसोडे यांच्यासह शहराध्यक्ष योगेश बहल कार्यकर्त्यांना ताकद देण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा गट थंड पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शहरातील बहुसंख्य नगरसेवक अजित पवारांसोबत गेले होते. त्यानंतर वर्षभरातच या गटाला घरघर लागली. लोकसभा निवडणुकीनंतर या गटाला मोठे धक्के सोसावे लागले होते. तत्कालीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह २० ते २५ नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार गटाला शहराध्यक्ष मिळणे मुश्किल झाले होते. अखेर माजी महापौर योगेश बहल यांची वर्णी लागली. शरद पवारांकडे गेलेले बहुतांशी नगरसेवक विधानसभा निकालानंतर माघारी वळले. या दरम्यान, शहराध्यक्ष बहल यांच्या तक्रारी पवार यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना शहराध्यक्ष करण्यास विरोध केल्याचे पुढे आले होते.
विधानसभा उपाध्यक्ष नावालाच
शहराला अण्णा बनसोडे यांच्या रूपाने विधानसभेचे उपाध्यक्षपद लाभले आहे. मात्र, बनसोडे कार्यकर्त्यांना सोडाच, पदाधिकाऱ्यांही भेटत नाहीत. ना पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. उपमुख्यमंत्री पवार शहरात येणार असतील, तरच ते हजर असतात. इतरवेळी ते गायब असतात. त्यामुळे शहराला दिलेले एवढे मोठे पद फक्त शोभेसाठीच आहे का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
नवसंजीवनी देणारा शहराध्यक्ष हवा
अजित गव्हाणे पक्ष सोडून गेल्यानंतर अजित पवार गटाचा शहराध्यक्ष स्थानिक व सर्वांना सामावून घेणारा असावा, यासाठी त्यावेळी शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेतली होती. मात्र, ऐनवेळी पवारांनी बहल यांचे नाव जाहीर करत सर्वांना धक्का दिला होता, तेव्हापासून शहरातील एक गट नाराज आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवसंजीवनी देणारा शहराध्यक्ष हवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.