Ujani Dam History : यशवंतरावांची शेतकऱ्यांप्रती दूरदृष्टी, उजनीमुळे बहरली सृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 08:51 PM2021-10-06T20:51:59+5:302021-10-06T21:11:09+5:30

उजनी धरणामुळेच सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील क्षेत्रात ऊस शेतीचे उत्पादन वाढीस लागलं आहे. त्याचाच परिणाण म्हणून या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत.

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी आणि पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं असलेले उजनी धरण मंगळवार ५ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री अकराच्या सुमारास १०० टक्के भरले.

धरणात ११७ टीएमसी पाणी साठा झालेला आहे. १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत धरणात १११.५९ टक्के पाणी पातळी व १२३.२८ टीएमसी पाणी साठा होणे नियोजित आहे.

उजनी धरणाच्या मागील ४२ वर्षांच्या इतिहासातील १०० टक्के भरण्याची ही ३७ वी वेळ आहे. या धरणाचा इतिहासही धरणासारखाच मोठा आहे.

उजनी धरणाचे भूमीपूजन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १९६४ साली करण्यात आले असून या धरणाचे बांधकाम १९८० साली पूर्ण झाले आहे.

या धरण बांधणीला तब्बल १६-१७ वर्षाचा इतका मोठा कालावधी लागला. हे धरण महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक असून या धरणात पुण्यातील मुळा व मुठासह इतर नद्यांमधून पाणी येते.

उजनी धरणाची उंची ५६.४ मी. तर लांबी २५३४ मी. इतकी आहे. या धरणाचे साठवण तलाव खूप मोठे असून यास 'यशवंत सागर जलाशय' असे नामकरण करण्यात आले.

या उजनी धरणात तब्बल १५१७ गिगालिटर्स पाणी साठवण्याची क्षमता आहे. ११७ टीएमसी पाणी जमा झाल्यावर उजनी धरण १०० टक्के भरते तर १२३ टीमएसी म्हणजेच १११ टक्के इतके एकूण पाण्याची साठवण करता येते.

या धरणाच्या मोठ्या जलाशयामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासेमारीचा व्यवसायही चालतो. तसेच हिवाळ्यात या जलाशयावर फ्लेमिंगो या परदेशी पक्षांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने इथे पक्षी निरीक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पक्षी निरीक्षक येत असतात.

उजनी धरणावर विजनिर्मितीही करण्यात येते. धरणाच्या तळाशी ऐतिहासिक पळसदेव मंदिर व इनामदार वाडा असून दुष्काळाच्या वेळी म्हणजेच पाणी साठा कमी झाल्यावर या ऐतिहासिक वास्तूंच्या दर्शनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असतात.

२०१६ च्या दुष्काळावेळी गाजलेल्या सैराट या मराठी चित्रपटाचे काही भाग या धरणाच्या परिसरात चित्रीत करण्यात आले आहे. तर, या धरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आले.

उजनी धरणामुळेच सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील क्षेत्रात ऊस शेतीचे उत्पादन वाढीस लागलं आहे. त्याचाच परिणाण म्हणून या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत.