भाजी-डाळ किंवा भातात मीठ कधी घालायचं? मीठ घालण्याची योग्य वेळ, पाहा चवीचे खरे सिक्रेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2026 18:37 IST2026-01-18T18:32:29+5:302026-01-18T18:37:51+5:30
When to add salt in cooking: Salt in Indian cooking: Salt in Indian cooking: पदार्थांनुसार मीठ कोणत्या वेळी घालायला हवं.

कोणताही पदार्थ बनवताना कितीही महागडे मसाले वापरले, तरी जोपर्यंत त्यात मीठ पडत नाही, तोपर्यंत जेवणाला चव येत नाही. खरंतर मीठ हा अन्नाचा आत्मा असतो. पण केवळ मिठाचे प्रमाण योग्य असून चालत नाही, तर ते कधी घातले जाते यावर पदार्थाचा पोत आणि चव टिकून असते. (When to add salt in cooking)

चुकीच्या वेळी घातलेले मीठ आपली डाळ कडक करु शकते किंवा भाजीला जास्त पाणी सोडू शकते. यासाठी प्रत्येक पदार्थात मीठ घालण्याची वेळ देखील माहित असायला हवी. पाहूया पदार्थांनुसार मीठ कोणत्या वेळी घालायला हवं.(Salt in Indian cooking)

अनेकजण डाळ कुकरमध्ये शिजवताना त्यात मीठ घालतात. पण चण्याची डाळ किंवा कडधान्य शिजवत असाल तर मीठ सुरुवातीला टाकू नका. यामुळे डाळ शिजायला जास्त वेळ घेते. डाळ शिजल्यानंतर वरुन मीठ घातल्यास ती छान व मऊ शिजते.

पालेभाज्या शिजण्यापूर्वी जास्त दिसतात पण शिजल्यानंतर त्याचे प्रमाण कमी होते. अशावेळी सुरुवातीला मीठ घातल्यास त्याचे प्रमाण चुकण्याची आणि भाजी खारट होण्याची शक्यता असते. त्यासाठी पालेभाज्या अर्ध्या शिजल्यानंतर वरुन किंवा शेवटी मीठ घाला.

फोडणीच्या रस्सा भाज्यांमध्ये मसाला परतवताना मीठ घातल्यास मसाल्याला तवंग चांगला येतो.

इडली-डोसा बॅटरमध्ये मीठ कधी घालायचे हे तापमानावर अवलंबून असते. उन्हाळ्यात पीठ लवकर आंबते, त्यामुळे मीठ आंबवल्यानंतर घालावे. थंडीच्या दिवसात पीठ लवकर आंबत नाही, अशा वेळी पिठात आधीच मीठ घातल्यास आंबवण्याची प्रक्रिया लवकर होते.

आपण साधा भात बनवत असू, तर पाणी उकळतानाच मीठ घालणं योग्य असतं. यामुळे मिठाची चव तांदळाच्या दाण्यांच्या आतपर्यंत जाते. बिर्याणी किंवा पुलाव बनवतानाही तांदूळ टाकण्यापूर्वी पाण्यात मीठ घातल्यास भात सुटसुटीत होतो.

कढी किंवा दह्याची भाजी बनवताना मीठ नेहमी शेवटी घालावे. सुरुवातीला मीठ घातल्यास दही फाटण्याची शक्यता असते.

कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये मीठ अगदी जेवायला बसतानाच घालावे. आधी मीठ घातल्यास भाज्यांना पाणी सुटते आणि त्यातील कुरकुरीतपणा निघून जातो.

















