सॅलेड म्हणून चुकूनही खाऊ नका ‘या’ भाज्या कच्च्या, होतील जुलाब-बिघडेल पचन कायमचं..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2025 15:47 IST2025-12-23T12:00:48+5:302025-12-23T15:47:33+5:30

सॅलेड म्हणजेच कच्च्या भाज्या खाण्याचा सध्या खूप ट्रेण्ड आहे. बरेच लोक डाएट करतात. त्यात फायबर मिळावे म्हणून कच्च्या भाज्या सॅलेड स्वरुपात खातात. पण सगळ्याच भाज्या त्यांच्या मूळ स्वरुपात खाणे आपल्या तब्येतीसाठी चांगले नसते.

म्हणूनच तुम्हीही काही भाज्या कच्च्या खात असाल तर पुढे दिलेली माहिती वाचा. यामध्ये आयुर्वेद एक्सपर्ट डिंपल जांगडा सांगत आहेत की या भाज्या कच्च्या खाल्ल्याने पोटाला खूप त्रास होऊ शकतो. पचनक्रिया बिघडू शकते. त्यामुळे ज्यांना अपचनाचा आधीच खूप त्रास असतो त्यांनी तर पुढे सांगितलेल्या कच्च्या भाज्या खाणं पुर्णपणे टाळलं पाहिजे.

पहिली भाजी आहे पालक. पालकामध्ये ऑक्झालेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं. पालक जर कच्चा खाल्ला तर किडनीस्टोनचा धोका वाढू शकतो. जेव्हा आपण पालक शिजवून घेतो तेव्हा त्यातलं ऑक्झालेट्स प्रमाण कमी होतं.

बऱ्याचदा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये पत्ताकोबी कच्ची घातली जाते. गार्निशिंगसाठी तिचा वापर केला जातो. किंवा काही ठिकाणी पत्ताकोबीची कोशिंबीरही केली जाते. पण अशा पद्धतीने कच्ची पत्ताकोबी खाल्ल्यास तिच्यामध्ये असणारे tapeworm eggs तसेच राहतात आणि ते थेट पोटात जाण्याचा धोका असतो. त्यामुळे कच्ची पत्ताकोबी खाणंही टाळायला हवं.

सॅण्डविच करताना अनेकजण सिमला मिरचीही त्यात कच्ची घालतात. पण ती देखील कच्ची खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे.

वांगंदेखील पुर्णपणे शिजवून मगच खायला हवं. कारण त्यावरही खूप जास्त पॅरासाईट्स असतात. ते कच्चं खाल्ल्याने हे सगळे पॅरासाईट पोटात जातात आणि पचनक्रिया बिघडते.

















