पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर घरात करा ६ गोष्टी, साथीचे आजार देणार नाहीत त्रास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 18:16 IST2025-06-17T18:10:26+5:302025-06-17T18:16:46+5:30

पाऊस येतो आनंद घेऊन, मात्र अनेकदा त्यामागोमाग आजारपणंही येतात. दूषित पाण्यामुळे अनेक आजार होतात. लहान मुलं आणि वृद्ध माणसं लवकर आजारी पडतात. त्यामुळे पावसाळ्यात आहारासह स्वच्छ पाणी, योग्य आहार, हलका व्यायाम हे सारंही महत्त्वाचं आहे.

दरवर्षी दूषित पाण्यामुळे विविध साथीचे आजार होतात. २०२३ मध्ये १९ वेळा साथ आली तर २०२४मध्ये २६ हून अधिक साथींची नोंद झालेली आहे. यंदाही पावसाळा लवकर सुरू झाल्यानं साथीचे आणि अस्वच्छ पाण्यामुळे होणारे आजार लवकर होत आहेत.

दमट हवामान, कधी थंडी वाजते, कधी उकडते. त्यात पचनशक्ती मंदावते, राेगप्रतिकारशक्तीही कमी होते. लहान मुलांना लवकर संसर्ग होऊ लागतात. कारण, शाळा नुकत्याच सुरू झालेल्या असतात.

त्यामुळे पाणी उकळून गार केलेलं प्या किंवा योग्य फिल्टर केलेच प्या. आपली पाण्याची बाटली कायम सोबत ठेवा. बाहेरचं खाणं टाळा, सरबतं-ज्यूस तर मुळीच बाहेरचे पिऊ नका.

लहान मुलांची नखं वाढलेली असतील तर ती तातडीने काढा. ते बाहेरून खेळून आल्यावर हात स्वच्छ धुवा. ओले, कडक न वाळलेले कपडे वापरू नका.

आपल्या अवतीभोवती कुंड्यात, जुन्या वस्तूत, घरासमोर पाणी साचणं धोक्याचं. त्यामुळे डास वाढतात आणि त्यातून आजार होतात. सर्वांत महत्त्वाचे संसर्गजन्य आजार झाला असेल तर इतरांशी संपर्क कमी करा.