पाणीपुरीच कशाला एरवीही प्या चिंचेचे आंबटगोड पाणी, पोटासाठी फायद्याचे आणि चवीलाही मस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2025 18:50 IST2025-07-30T18:44:14+5:302025-07-30T18:50:52+5:30
Drink sweet and sour tamarind water, it is good for the stomach and tastes great too, healthy home remedies : चिंचेचे पाणी आरोग्यासाठी एकदम मस्त. पाहा किती फायदेशीर आहे पोटासाठी. चवीला जेवढे मस्त तेवढेच पौष्टिकही.

चिंचेचे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. चिंच हा एक आंबट-गोड चव असलेला पदार्थ असून, तो विविध पोषणमूल्यांमुळे शरीरासाठी चांगला असतो. मात्र चिंचेचे फायदे सगळ्यांनाच माहिती नसतात.
चिंचेचे पाणी करुन ते भाजीत, आमटीत, तसेच चटणीत घातले जाते. मात्र फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्याच्यादृष्टीनेही हे पाणी वापरायला हवे. या पाण्यात अँण्टीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम, फायबर आणि इतरही काही गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. जे शरीराच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत करतात.
चिंचेचे पाणी पचायला हलके असून अपचन, गॅसेस आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांवर हे पाणी फार उपयुक्त ठरते. जेवणानंतर जर जडपणा वाटत असेल, तर चिंचेचे पाणी घेतल्यास पचनक्रिया सुधारते. यामध्ये असणारे अॅसिडिक घटक पचनरसाचा ताकद वाढवतात. त्यामुळे अन्न सहजपणे पचते. त्याचबरोबर चिंचेमध्ये नैसर्गिक रेचक (Laxative) गुणधर्म असल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
चिंचेचे पाणी शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. उन्हाळ्यात किंवा अतिउष्णतेच्या दिवसांत हे पाणी शरीर थंड ठेवते. उष्माघाताचा धोका कमी होतो. चिंचेचे पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते.
चिंचेमध्ये अँण्टी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे सांधेदुखी, स्नायूंचा त्रास किंवा सूज अशा त्रासांवर चिंचेचे पाणी गुणकारी ठरते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यातही चिंचेचे पाणी उपयुक्त ठरू शकते. कारण त्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण कमी असून ते रक्तातील इन्सुलिनच्या कार्यावर चांगला परिणाम करते.
चिंचेचे पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यामध्ये असणारे अँण्टीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींचे रक्षण करतात. डिटॉक्स ड्रिंक म्हणून चिंचेचे पाणी नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय आहे. त्वचेचा पोत चांगला राहतो.
चिंचेचे पाणी हे आरोग्यवर्धक पेय असून ते आहारात असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. पचनक्रिया सुधारते, त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पण कोणताही पदार्थ अति खाणे चांगले नाही.