काळ बनून आली संध्याकाळ...! मरण एवढे स्वस्त झाले का? नवले पुलाजवळ होणाऱ्या अपघातांची प्रमुख कारणे कोणती ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:46 IST2025-11-14T16:17:30+5:302025-11-14T16:46:11+5:30
पुणे - बंगळुरू - पुणे महामार्गावर नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने शहर हादरले. ही संध्याकाळ सात निष्पाप जीवांसाठी 'काळ' ठरली. घटनास्थळी पसरलेला काळोख, वाहनांचे चेंदामेंदा झालेले अवशेष आणि जखमींच्या नातेवाइकांचा हंबरडा हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.

दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणांतच ७ जण जळून खाक झाले, तर तब्बल २० ते २२ जण जखमी झाले. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला.

या अपघातात मृत्यू झालेल्या ७ जणांमध्ये एक ५ वर्षांची चिमुकलीही आहे. बाल दिनाच्या पूर्वसंध्येलाच बालिकेचा असा अंत झाल्याने सर्वच पुणेकर हळहळले.

या परिसरात याआधीही अनेक अपघात घडले असून स्थानिक नागरिकांचा संताप पुन्हा उफाळून आला आहे. ‘नवले पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात,’ अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

नवले पुलाजवळ होणाऱ्या अपघातांची प्रमुख कारणे सध्या चर्चेत आली आहे

तीव्र उतार असल्याने अवजड वाहनांना अचानक ब्रेक लागणे अशक्य होते, काही ठिकाणी सेवा रस्ते नसल्याने स्थानिक वाहनचालकांना राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो.

अवजड वाहनांचे चालक इंधन वाचविण्यासाठी उतारावरून वाहन 'न्यूट्रल' करीत असल्याने वाहनांवरील ताबा सुटतो.

सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या वतीने महामार्गावर ‘सावधान, पुढे नवले पूल आहे’ अशा आशयाचे फलक महामार्गावर लावण्यात आले होते. मात्र, तात्पुरत्या उपाययोजना सोडल्या तर प्रशासनाकडून कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

नवले पूल ते वारजे या महामार्गाच्या बाजूने सर्व्हिस रोड तातडीने पूर्ण करावा परिसरातील अतिक्रमणे कायमस्वरूपी काढणे गरजेचे.

स्वामिनारायण मंदिरासमोरील सव्र्व्हिस रोडवर दररोज वाहतूककोंडी होते. येथील पूल मोठा करणे आवश्यक

नवले पूल ते वारजे दरम्यानच्या जागा मालकांना एफएसआय किंवा मोबदला देऊन त्यांच्याकडून जागा ताब्यात घेऊन महापालिकेचा सव्र्हिस रोड तयार करणे गरजेचे.

अपघात रोखण्यासाठी आरटीओ प्रशासनाने बोगद्याजवळ अवजड वाहने थांबवून क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे?

















