मराठी माणसानं जिंकलेलं पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिलं पदक; जाणून घेऊया १२ पदकांचा गौरवशाली इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 02:39 PM2021-08-21T14:39:28+5:302021-08-21T15:00:07+5:30

भारतीय खेळाडू टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत आपला दबदबा दाखवण्यासाठी उतरणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना ७ ( १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य) पदकांची कमाई केली. आता सर्वांचे लक्ष २४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेकडे लागले आहे. भारतानं पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत १२ पदकं जिंकली आहेत.

भारतानं १९६८मध्ये सर्वप्रथम पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता, परंतु तेव्हा पदकाची पाटी कोरी राहिली होती. १९७२मध्ये भारतानं पहिलं पॅरालिम्पिक पदक जिंकलं अन् तेही एका मराठी माणसानं हे पदक जिंकून दिलं. मुर्लीकांत पेटकर यांनी हेडलबर्ग येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत जलतरणात ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं.

मुर्लीकांत पेटकर यांनी ३७.३३ सेकंदाची वेळ नोंदवून हा सुवर्ण पराक्रम केला. याच स्पर्धेत त्यांनी भालाफेक व स्लॅलोम या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता अन् अंतिम फेरीतही प्रवेश केला होता. २०१८मध्ये त्यांना पद्म श्री पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं.

भारतीय सैन्यातील Corps of Electronics and Mechanical Engineers (EME) विभागात ते कार्यरत होते. १९६५च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांना बुलेटच्या गोळ्यांमुळे गंभीर जखमा झाल्या अन् त्यांना अपंगत्व आले. ते EMEसाठी बॉक्सिंग करायचे, परंतु अपंगत्वानंतर त्यांनी जलतरण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जलतरणात चार पदकं जिंकली.

मुर्लीकांत पेटकर यांच्यानंतर भारताला पॅरालिम्पिक पदकासाठी १२ वर्ष वाट पाहावी लागली. भीमराव केसरकर यांनी १९८४मध्ये न्यूयॉर्क आणि स्टॉक मेडेव्हिले येथे झालेल्या स्पर्धेत भालाफेकीत रौप्यपदक जिंकले. त्यांनी भालाफेक L6 प्रकारात सहभाग घेतला होता. या क्रीडा प्रकारातील देशाचे हे पहिलेच पदक होते.

१९८४मध्ये जोगिंदर सिंग बेदी यांनी पदकांची हॅटट्रिक केली. त्यांनी दोन कांस्य व एक रौप्यपदक जिंकले. त्यांनी भालाफेकीत L6 प्रकारात आणि थाळी फेरीत कांस्य, तर गोळाफेकीत रौप्यपदक जिंकले.

१९८४नंतर २० वर्षांनंतर भारताला पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकता आले. २००४मध्ये २३ वर्षीय देवेंद्र झाझरियानं पदार्पणात L 6 प्रकारात भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. पेटकर यांच्यानंतर सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.

२००४च्या एथेन्स स्पर्धेत भारताला दुसरे पदक मिळवून दिले ते राजिंदर सिंग राहेलू यानं. अर्जुन पुरस्कार प्राप्त या खेळाडूनं पॉवरलिफ्टिंगमध्ये ५६ किलो वजनी गटात कांस्यपदक नावावर केले.

२०१२च्या लंडन स्पर्धेत गिरीश एन गौडानं उंच उडी F42 प्रकारात १.७४ मीटर उंच उडी घेत रौप्यपदक जिंकले.

२०१६मध्ये उंच उडीत मरियप्पन थंगावेलूनं सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानं १.८९ मीटर उंच उडी मारली. मरियप्पन यंदाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. याच गटात कांस्यपदकही वरूण सिंग भाटी ( १.८६ मी.) याच्या नावावर राहिले.

भारताला ३२ वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या देवेंद्र झाझरियानंही २०१६मध्ये पुन्हा सुवर्णपदकाची कमाई केली. भारतासाठी दोन सुवर्णपदक जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. रिओत त्यानं ६३.९७ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रिकॉर्डसह इतिहास रचला. त्याला खेल रत्न पुरस्कारानंही गौरविण्यात आले.

२०१६मध्येच दीपा मलिक यांनी गोळाफेकीत F53 प्रकारात ४.६१ मीटरचे अंतर पार करून रौप्यपदक जिंकले. २०१७मध्ये त्यांना पद्म श्री व २०१९मध्ये खेल रत्न पुरस्कारानं गौरविण्यात आले.