आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत या भारतीय खेळाडूंनी 'गोल्डन' कामगिरीसह रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:46 IST2025-05-30T18:08:57+5:302025-05-30T18:46:24+5:30
स्पर्धेतील चौथ्या दिवसाअखेर भारतीय खेळाडूंनी केली ८ सुवर्ण पदकाची कमाई

आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून दाखवलीये. दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरु असलेल्या स्पर्धेतील चौथ्या दिवसाअखेर भारत ८ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकासह पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. इथं एक नजर टाकुयात या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर
२०२५ च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शुक्रवारी गुलवीर सिंगने पुरुषांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. त्याने १३:२४.७८ वेळसह या स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. याआधी हा विक्रम मोहम्मद अल-गारनी याच्या नावे होता. २०१५ च्या स्पर्धेत त्याने १३:३४.४७ वेळेत ५००० मीटर अंतर पार केले होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी त्याने १०००० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले होते.
महिला गटात पूजा सिंग हिने एतिहासिक कामगिरी नोंदवलीये. उंच उडी प्रकारात तिने १.८९ मीटर उंचउडी मारत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत सुवर्ण पटकवणारी ती दुसरी भारतीय महिला ठरलीये. तिच्या आधी बॉबी अलॉयसियस हिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये उंच उडीत पदक जिंकले होते. बॉबीने २००० मध्ये सुवर्ण आणि २००२ मध्ये रौप्यपदकाला गवसणी घातली होती.
नंदिनी आगासरा हिने हेप्टॅथलॉन स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करुन दाखवलीये. या क्रीडा प्रकारात स्वप्ना बर्मन (२०१७) आणि सोमा बिस्वास (२००५) यांच्यानंतर सुवर्ण पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय ठरली.
पारुल चौधरी हिने ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले. ९:१२.४६ वेळ नोंदवून तिने या स्पर्धेत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी २०२३ मध्येही तिने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा गाजवली होती.
२०१९ मध्ये आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्रातील बीड येथील अविनाश साबळेने स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ८:२०.९२ वेळेसह ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्ण पदक कमावले.
भारताच्या ज्योती याराजीने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये १०० मीटर अडथळा शर्यतीचे विजेतेपद यशस्वीरित्या कायम राखले. यंदाच्या हंगामात तिने १२.९६ सेकंदांसह नवीन विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले.
महिलांच्या ४x४०० मीटर रिले स्पर्धेत जिस्ना मॅथ्यू, रूपल चौधरी, कुंजा रजिथा आणि शुभा वेंकटेशन यांनी हंगामातील सर्वोत्तम वेळ (३:३४.१८ सेकंद) नोंदवत सुवर्णपदक जिंकले.
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मिश्र ४X४०० मीटर रिलेमध्ये संतोष, रूपल, विशाल आणि सुभा या चौघांनी भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली.