भारतात पहिली टॅक्सी कुठून धावली? 'काली-पीली'चा १०० वर्षांचा रंजक इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 20:34 IST2026-02-11T20:27:36+5:302026-02-11T20:34:00+5:30

तुम्हाला माहित आहे का? देशातील पहिली टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू झाली आणि ती कोणी आणली?

आज आपण एका क्लिकवर ओला-उबेर किंवा टॅक्सी बुक करतो, पण भारतामध्ये या टॅक्सी व्यवसायाची मुळं शंभर वर्षांहून अधिक जुनी आहेत. अलीकडेच दिल्ली-एनसीआरमध्ये 'भारत टॅक्सी' सेवा सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा टॅक्सीच्या इतिहासाची चर्चा रंगू लागली आहे. तुम्हाला माहित आहे का? देशातील पहिली टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू झाली आणि ती कोणी आणली? चला जाणून घेऊया या प्रवासाचा रंजक इतिहास.

भारतातील पहिल्या मोटर टॅक्सी सेवेची सुरुवात स्वप्नांच्या नगरीत म्हणजेच मुंबईत झाली. ब्रिटिश राजवटीत मुंबई हे देशातील सर्वात मोठे बंदर आणि व्यापारी केंद्र होते. त्यामुळे आधुनिक वाहतुकीचा कोणताही प्रयोग करण्यासाठी मुंबई हीच पहिली पसंती होती.

देशात संघटित मोटर वाहतुकीची सुरुवात १९११ मध्ये झाली. तो काळ असा होता जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर बैलगाड्या आणि घोडागाड्यांचे साम्राज्य होते. या पारंपारिक वाहनांना फाटा देत मशीनवर चालणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच टॅक्सीचे आगमन झाले. यामुळे शहरी वाहतुकीच्या वेगाला एक नवी दिशा मिळाली.

विशेष म्हणजे, या सेवेचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला दिले जात नाही. टॅक्सी सेवा ब्रिटिश वसाहतवादी प्रशासनांतर्गत सुरू करण्यात आली होती. अधिकारी, व्यापारी आणि शहरातील उच्चभ्रू लोकांसाठी घोडागाडीपेक्षा वेगवान आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता.

टॅक्सी येण्यापूर्वी मुंबई पूर्णपणे घोडागाड्यांवर अवलंबून होती. मोटर टॅक्सींच्या आगमनाने प्रवासाचा वेळ वाचला आणि सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिक पर्व सुरू झाले. मुंबईची जगप्रसिद्ध ओळख असलेली 'काली-पीली' टॅक्सी साधारण १९६४ च्या सुमारास लोकप्रिय झाली आणि कालांतराने ती या शहराची सांस्कृतिक ओळख बनली.

मुंबईनंतर कोलकातामध्ये पहिल्या महायुद्धानंतर टॅक्सी व्यवसायाने मोठी झेप घेतली. विशेष म्हणजे, कोलकातामध्ये टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यात आणि तो यशस्वी करण्यात शीख समुदायाचे मोठे योगदान राहिले आहे.