गलवान खोऱ्यात 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?; हल्ल्यातील जखमी जवानानं सांगितला संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 06:48 PM2020-06-18T18:48:02+5:302020-06-18T19:00:58+5:30

लडाखच्या गलवान खोऱ्यात LACवर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलेलं आहे.

भारत आणि चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे जवान सुरेंद्र सिंह गंभीर जखमी झाली होते. त्यामुळे त्यांच्यावर लडाखमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते. ज्यावेळी त्यांना तब्बल १२ तासांनंतर शुद्धीवर आल्यानंतर सीमेवर नक्की काय झालं होतं. याबाबत सुरेंद्र सिंह यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांनी अचानकपणे भारतीय सैन्यावर हल्ला केला. दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये जवळपास ४ ते ५ तास संघर्ष सुरु होता. जेव्हा संघर्षाला सुरुवात झाली तेव्हा भारताचे जवळपास २ हजारच्या आसपास जवान गलवान खोऱ्याजवळ तैनात होते. तर चीनचे १०००हून अधिक सैनिक उपस्थित होते.

दोन्ही देशाच्या सैन्यांमध्ये गलवानच्या थंड पाण्याच्या खोऱ्यात संघर्ष सुरु होता. तसेच जेव्हा संघर्ष सुरु झाला तेव्हा खोऱ्याच्या किनाऱ्यालगत एक माणूस जाऊ शकेल इतकीच जागा होती. त्यामुळे भारताच्या सैनिकांना परिस्थिती सांभळण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. चिनी सैनिकांनी एक षडयंत्र आखून तसेच फसवणुक करुन भारतीय सैनिकांवर हल्ला केला. चिनी सैनिकांच्या या कृत्यानंतर भारतीय जवानांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे सुरेंद्र सिंह यांनी सांगितले.

५ फूट पर्यतच्या पाण्यात जवळपास ५ तास सुरु असलेल्या संघर्षामध्ये सुरेंद्र सिंह यांना डोक्याला मार लागला असून एक हात फॅक्चर झाला. यानंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच यादरम्यान त्यांचा मोबाईल देखील पाण्यात हरवला असल्याचे सुरेंद्र सिंह यांनी सांगितले.

भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक संघर्षानंतर दोन देशांमधील तणाव वाढतच चालला आहे. पण भारतीय सीमेवर संघर्ष वाढू नये, अशी चीनची भूमिका आहे. सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री रात्री दोन्ही देशांमधील हिंसक चकमकीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४३ सैनिकांचा खात्मा केला.

चीनने आता कुरापती केल्यास योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान सज्ज आहेत. सीमेवर चीनने आपल्या सैन्यात वाढ केल्यानंतर भारताने गलवान घाडी, दौलत बेग ओल्डी, चुशुल आणि देपसांगमध्ये अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

Read in English