धक्कादायक ! तीन सुनांनी एकत्र येऊन केला सासूचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 03:52 PM2020-09-02T15:52:30+5:302020-09-02T15:59:45+5:30

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील हरलाया गावांत तीन सुनांनी मिळून सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक विवादातूनच सुनांकडून सासूला ठार मारण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे हत्येनंतर तिन्ही सुनांनी मिळून सासूला फासावर लटकवले होते, आत्महत्येचा बनाव रचण्याचा या तिन्ही सुनांचा डाव फसला. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही सुनांना अटक केली आहे.

संबंधित घटनेनंतर शेजारील कुटुंबीयांना पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

शवविच्छेदन अहवालातून ही आत्महत्या नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली. अखेर खूनी घरातीलच तीन सुना असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

जोधपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक राहुल बाहरट यांनी सांगितले की, रामदेव नगर हरलाया येथील 62 वर्षीय कमलादेवी यांचा 28 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना 29 ऑगस्ट रोजी माहिती मिळाली.

सुरुवातीला पोलिसांनी देण्यात आलेल्या माहितीनुसार, कमलादेवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, मृत कमलादेवीच्या कुटुंबीयांनी सुनांवर हत्येचा आरोप केला होता.

कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत, सुनांकडे सक्तीने विचारपूस केली. त्यावेळी, तिन्ही सुनांनी खुनाची कबुली दिली. हत्या केलेल्या आरोपींमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे.

सासू आणि सुनांमध्ये घरगुती कारणांवरुन सातत्याने भांडण होत होते. सासूच्या दररोजच्या किरकिरीला कंटाळून सुनांकडून हे हत्येचे कृत्य करण्यात आले.

रुममधील पंख्याजवळच्या पाईपला रस्सी बांधून सासूचा मृतदेह लटकवला होता. त्यानंतर, सुनांनी घरातून पळ काढला. दुपारी 2 वाजता मृत महिलेची मुले मदन आणि ओमप्रकाश घरी आले होते.

मुलांनी रुममध्ये आईचा लटकलेला मृतदेह पाहिल्यानंतर आक्रोश केला. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांच्या तपासानंतर या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये, तिन्ही सुनांनी एकत्र येत हे कृत्य केल्याचे निष्पण्ण झाले आहे.

Read in English