मध्य पूर्वेतील युद्धातच रशियानं भारताला दिली जबरदस्त ऑफर; शत्रू राष्ट्रांना घाम फुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:19 IST2026-03-24T19:15:10+5:302026-03-24T19:19:01+5:30

अमेरिका इस्रायलनं इराणवर संयुक्त हवाई हल्ले केले. त्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलसह आखाती देशातील अमेरिकन सैन्य तळांना टार्गेट केले. यामुळे मध्य पूर्वेत युद्ध पेटले. त्याचा परिणाम जागतिक तेल बाजारावर झाला.

एकीकडे मध्य पूर्वेत युद्ध सुरू असताना दुसरीकडे रशियाने भारताला संपूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरणासह दोन आसनी एसयू-५७ विमान देण्याचा प्रस्ताव दिला आहे. रशियाचे स्टेल्थ लढाऊ विमानाचा करार इंडो-पॅसिफिकमधील हवाई शक्तीचे संतुलन बदलू शकतो. दोन आसनी एसयू-५७ हे मानवरहित वैमानिकांच्या एकत्रित वापरासाठी तयार करण्यात आले आहे.

याचा अर्थ असा की, हे दोन आसनी एसयू-५७ युद्धभूमीवर ड्रोन नियंत्रित करू शकेल, ज्यामुळे केवळ टेहळणी क्षमताच नव्हे, तर हल्ला करण्याची क्षमताही वाढेल. रशियाने या करारामध्ये अमर्याद तंत्रज्ञान हस्तांतरणाचे आश्वासनही दिले आहे.

पाचव्या पिढीच्या विमानांसाठी वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताला एक प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून स्थापित करणे हा या प्रस्तावाचा उद्देश आहे. डिफेन्स सिक्युरिटी एशियाच्या एका रिपोर्टनुसार, रशियाने 'विंग्स इंडिया २०२६' दरम्यान हा प्रस्ताव सादर केला होता.

हे दोन आसनी एसयू-५७ हे युद्धभूमीवर स्वार्म ड्रोन नियंत्रित करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. शिवाय या विमानात स्वदेशी शस्त्रे बसवता येतात आणि त्याचे उत्पादन स्थानिक पातळीवर केले जाऊ शकते असा रशियाचा दावा आहे.

भारताचा 'अ‍ॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट' (AMCA) कार्यक्रम पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत भारत रशियन एसयू-५७ चा एक अंतरिम उपाय म्हणून विचार करू शकतो असं तज्ज्ञांना वाटते. एसयू-५७ लढाऊ विमानांसाठी रशियाच्या नवीन प्रस्तावात तंत्रज्ञान, उत्पादन हक्क आणि दीर्घकालीन सुधारणा मिळवण्याचे आश्वासन दिले आहे.

ज्या उत्पादन चिंतांमुळे भारताने या विमानांच्या निर्मितीसाठीच्या एफजीएफए (FGFA) भागीदारी कार्यक्रमातून माघार घेतली होती, त्या दूर करणे हा रशियाचा उद्देश आहे. रशिया एसयू-५७ ला केवळ एक लढाऊ विमान विक्री म्हणून नव्हे तर एक दीर्घकालीन औद्योगिक आणि ऑपरेशनल भागीदारी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.

भारताच्या सतत विकसित होत असलेल्या पाचव्या पिढीच्या लष्करी विकास धोरणामध्ये रशियाचे महत्त्व टिकवून ठेवणे, हा यामागील उद्देश आहे.

विंग्स इंडिया २०२६ मध्ये सादर केलेल्या प्रस्तावात एसयू-५७ च्या दोन आसनी संरचनेचा समावेश आहे, जे एक कमांड-व्हेरियंट प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल आणि मानवी-मानवरहित सहकार्य, सेन्सर फ्युजन व्यवस्थापन आणि नेटवर्क-आधारित युद्ध भूमिकांना समर्थन देण्यास सक्षम असेल असे अहवालात म्हटले आहे.

याचा उद्देश एक आसनी स्टेल्थ फायटर्सच्या तुलनेत कार्यात्मक क्षमता वाढवणे हा आहे. भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणानुसार सबसिस्टम इंटीग्रेशन आणि सुधारणांना परवानगी देणाऱ्या संपूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी रशिया देखील तयार असल्याचे रशियाने म्हटले आहे.