Rajasthan Political Crisis: पायलटांचं 'विमान' भाजपात गेलं तर...; राजस्थानात होणार 'इतका' मोठा राजकीय भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 03:55 PM2020-07-14T15:55:09+5:302020-07-14T16:03:26+5:30

राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष (Rajasthan Political Crisis) करणाऱ्या काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पायलट यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे.

काँग्रेसनं केलेल्या कठोर कारवाईमुळे आता सचिन पायलट यांच्या परतीचे दोर कापले गेले आहेत. त्यामुळे आता पायलट नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पायलट स्वत:चा पक्ष काढणार की ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याप्रमाणे भाजपामध्ये जाणार, याबद्दल उत्सुकता आहे.

पायलट यांना स्वत:कडे खेचण्यासाठी भाजपानं जोर लावला आहे. आतापर्यंत राजस्थानात भाजपानं वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. मात्र आता भाजपा नेते सक्रिय झाले आहेत.

सचिन पायलट यांनी आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं कालच म्हटलं होतं. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. काँग्रेसचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले आहेत. त्यामुळेच पायलट यांना भाजपामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत पायलट यांचा करिश्मा राजस्थानात दिसला आहे. एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या गुर्जर आणि मीणा समुदायांना एकत्र आणण्याचं अवघड काम पायलट यांनी करून दाखवलं. त्यामुळेच २०१८ मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता आली.

२००४ मध्ये खासदार होताच पायलट यांनी गुर्जर आणि मीणा समुदायांना एकत्र आणण्यासाठी एकता रॅली काढल्या. त्यांच्या या प्रयत्नांचा परिणाम २०१८ मध्ये दिसला. दोन्ही समुदायांनी काँग्रेसला भरभरून मतदान केलं. त्यामुळे भाजपाला सत्ता गमवावी लागली.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आव्हान देणाऱ्या पायलट यांच्या मागे मीणा समुदायाचे किमान पाच आमदार आहेत. याशिवाय पायलट गुर्जर समुदायाचे प्रतिनिधी असल्यानं त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

राजस्थानच्या राजकारणात गुर्जर आणि मीणा समुदायाची महत्त्वाची भूमिका आहे. राज्यातील लोकसंख्येत गुर्जरांचं प्रमाण ९ तर मीणा यांचं प्रमाण ७ ते ८ टक्के इतकं आहे. या दोन्ही समुदायांचा प्रभाव पूर्व राजस्थानातल्या ४९ मतदारसंघांमध्ये आहे.

दौसा, सवाई माधोपूर, भरतपूर, जयपूर ग्रामीण आणि करौलीमध्ये त्यांचं प्राबल्य आहे. पायलट यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या ४९ पैकी ४२ जागांवर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला. त्यामुळेच भाजपाला सत्ता सोडावी लागली.

गुर्जर आणि मीणा समुदायानं आतापर्यंत कधीही काँग्रेसला एकत्रित पाठिंबा दिला नव्हता. मात्र ही अवघड कामगिरी पायलट यांनी करून दाखवली.

पायलट यांना भाजपामध्ये आणण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. सिंधिया यांनी अवघ्या चार महिन्यांपूर्वी काँग्रेसचा हात सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

सिंधिया आणि पायलट यांची मैत्री अतिशय जुनी आहे. सिंधिया आणि पायलट यांची दिल्लीत भेट झाल्याचंही बोललं जात आहे. मात्र पायलट समर्थकांनी यामध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. सिंधिया यांनी पायलट यांनी मिळणाऱ्या वागणुकीबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती.