सोनिया, प्रियांका अन् राहुल गांधींनी कोरोना लस घेतली का? काँग्रेसनं दिलं उत्तर; भाजपवरही केला पलटवार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 04:47 PM2021-06-17T16:47:08+5:302021-06-17T17:01:41+5:30

"अनावश्यक मुद्द्यांवर बोलण्याऐवजी मोदी सरकारने रोज 80 लाख ते एक कोटी भारतीयांना लस देण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. म्हणजे 31 डिसेंबर 2021 पर्यंत 100 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होईल."(Congress)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोरोना लशीचे दोनही डोस घेतले आहेत आणि सरकारने अनावश्यक मुद्दे उकरून काढण्याऐवजी सर्व भारतीय नागरिकांचे लसीकरण कराण्याच्या आपल्या ‘राजधर्मा’चे पालन करायला हवे, असे काँग्रेसने म्हटले आहे. (Politics Congress says Sonia and Priyanka Gandhi taken corona vaccine gov should inoculate all instead of creating non issues)

पक्षाचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले आहे, की काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी हे कोरोनातून पूर्णपणे ठणठणीत झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेतली.

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कोरोना लस घेतली आहे का? असा सवाल अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात आल्यानंतर, काँग्रेसकडून ही टिप्पणी करण्यात आली आहे

सुरजेवाला म्हणाले, "अनावश्यक मुद्द्यांवर बोलण्याऐवजी मोदी सरकारने रोज 80 लाख ते एक कोटी भारतीयांना लस देण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. म्हणजे 31 डिसेंबर 2021 पर्यंत 100 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होईल."

सरकारला टोला लगावत सुरजेवाला म्हणाले, "कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेत भारतातील नागरिकांना निराश केल्यानंतर, सर्व लोकांचे लसीकरण करणे हाच या सरकारचा राजधर्म आहे."

कॉंग्रेस सरचिटणीस म्हणाले, "हर्षवर्धन हे देशाचे आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांना हे माहित असायला हवे, की कॉंग्रेस अध्यक्षांनी कोविशिल्ड लशीचे दोन डोस घेतले आहेत."

ते म्हणाले, "राहुल गांधी यांना 16 एप्रिल 2021 रोजी लशीचा डोस घ्यायचा होता. फ्लूची सौम्य लक्षणे दिसल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. आणि त्यानंतर 18 एप्रिल रोजी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ते लस घेतील.

प्रियांका गांधी यांनी लशीचा पहिला डोस घेतला असल्याचेही सुरडेवाला यांनी यावेळी सांगितेल. ते म्हणाले, “यानंतर 28 मार्चला त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्याही त्यांच्या संपर्कात आल्या. यामुळे आता लसीकरणासाठी लागणारा अनिवार्य कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या आणि त्यांचे पती लस घेतील.

यावेळी सुरजेवाला यांनी आरोप केला, की देशातील कोरोनाच्या चुकीच्या व्यवस्थापनाला मोदी सरकार आणि आरोग्यमंत्री जबाबदार आहेत. गेल्या सहा महिन्यांत लसीकरणाच्या बाबतीत आरोग्यमंत्री आणि सरकारच्या योग्य व्यवस्थापनाच्या आभावामुळे केवळ 3.51 टक्के लोकांचेच लसीकरण होऊ शकले आहे. गेल्या सहा महिन्यांत रोज सरासरी केवळ 17.23 लाख लोकांनांच लसी दिली गेली आहे.

यावेळी सुरजेवाला यांनी दावा केला, की "या वेगाने देशातील 94.50 कोटी वयस्क लोकांना लस टोचण्यासाठी आणखी 944 दिवस लागतील. अर्थात हे लसीकरण 16 जानेवारी, 2024 पर्यंत सुरूच राहील.’’