PM-Kisan : धक्कादायक! देशात 33 लाख अपात्र शेतकऱ्यांना मिळाले पीएम-किसान योजनेचे पैसे; जाणून घ्या 8 वा हप्ता कधी दिला जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 11:52 AM2021-02-08T11:52:52+5:302021-02-08T13:12:03+5:30

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 32,91 लाख अपात्र लाभार्थींच्या बँक खात्यात 2,326 कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी काही कर भरणारे लोक आहेत. याबाबत माहिती देताना कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) म्हणाले की, राज्य सरकार याची चौकशी करीत आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठविली जाते.

या योजनेत अनेक प्रकारच्या पडताळणी प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे, जेणेकरून कमीतकमी चुका होऊ शकतील आणि केवळ पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल, असेही कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

राज्यसभेत लेखी उत्तरात कृषीमंत्र्यांच्यावतीने सांगण्यात आले की, सध्या पडताळणी प्रक्रियेअंतर्गत 2,326.88 कोटी रुपये 32,91,152 अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पाठविण्यात आले असल्याचे आढळून आले. यामध्ये कर भरणारे काही लोक सुद्धा आहेत.

काही प्रकरणांमध्ये ब्लॉक/ जिल्हा अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अपात्र शेतकऱ्यांना लाभ दिला आहे, असेही नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत म्हटले आहे.

कर्नाटकात अशा प्रकराचे 2,03,819 चुकीचे रजिस्ट्रेशन झाले आहे असून त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तमिळनाडूमध्ये अशी सुमारे 6 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि त्यापैकी 158.57 कोटी रुपये वसूल झाले आहेत.

तामिळनाडूमध्ये आतापर्यंत 16 एफआयआर नोंदविण्यात आल्या असून 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील 7,000 शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीर, मेघालय, लडाख आणि आसाम वगळता इतर सर्व राज्यांसाठी पंतप्रधान-किसान पोर्टलला यूआयडीएआयच्या (UIDAI) माध्यमातून एकत्रित (इंटीग्रेट) करण्यात आले आहे.

या पोर्टलला आयकर डेटाबेसशी ((Income Tax Database)) देखील जोडले गेले आहे, जेणेकरून त्या लाभार्थ्यांचा मागोवा घेता येईल आणि त्यानंतर आयकर वसूल करता येईल.

दरम्यान, लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना या योजनेतील आठवा हप्ता होळीनंतर मिळू शकेल. एप्रिलपासून केंद्र सरकार आठवा हप्ता द्यायला सुरूवात करेल, अशी शक्यता आहे. मात्र, सरकारकडून याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नाही.काही मीडिया रिपोर्ट्सने असा अंदाज व्यक्त केला आहे.

या योजनेंतर्गत एप्रिल ते जुलै दरम्यान एक हप्ता, ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानचा दुसरा हप्ता व डिसेंबर ते मार्च दरम्यान वर्षाचा तिसरा हप्ता. डिसेंबर-मार्च 2020-21 साठी आतापर्यंत 9.45 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.