Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:29 IST2025-06-08T17:16:10+5:302025-06-08T17:29:00+5:30

Indian Famous Bridges : चिनाब नदीवर उभारलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा पूल भारतीय अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना आहे. मात्र, भारतातील आणखी असे पूल आहेत, जे त्यांच्या अनोख्या रचनेमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत.

चिनाब रेल्वे पूल : जम्मू-कश्मीरमधील चिनाब नदीवर बांधलेला हा पूल ३५९ मीटर उंच आहे, जो आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर अधिक उंच आहे. १३१५ मीटर लांबीचा हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ६ जून २०२५ रोजी त्याचे उद्घाटन केले. खडतर भूप्रदेशावर बांधलेला हा पूल भारतीय अभियांत्रिकीचा एक चमत्कार मानला जातो.

हावडा ब्रिज : १९४३ मध्ये बांधलेला हा पूल एकही नट-बोल्ट न वापरता उभारण्यात आला आहे. ७०५ मीटर लांब आणि २१.६ मीटर रुंद असलेला हा कॅन्टिलिव्हर पूल २८० फूट उंचीच्या खांबांवर उभा आहे. याचे नाव ‘रवींद्र सेतू’ असून, कोलकाता आणि हावड्याला जोडणारा हा पूल दररोज लाखो लोकांची वाहतूक करतो.

डबल डेकर रूट ब्रिज : मेघालयातील चेरापुंजीपासून ४५ किमी अंतरावर असलेला हा दोन स्तरांचा रबर झाडांच्या मुळांचा पूल आहे. याला तयार होण्यासाठी २५ वर्षे लागली असून, तो एका वेळी ५० लोकांचे वजन पेलू शकतो. हा पूल ५०० वर्षांपर्यंत टिकू शकतो. खासी जमातीकडून सुरू झालेली ही परंपरा आजही मेघालयात जीवंत आहे.

पंबन रेल्वे पूल : रामेश्वरमला जोडणारा २.०८ किमी लांबीचा हा रेल्वे पूल भारतातील पहिलाच उघडणारा पूल आहे. याचा ७२.५ मीटर उंच लिफ्टिंग स्पॅन फक्त पाच मिनिटांत उचलला जातो. वाऱ्याचा वेग ताशी ५० किमीहून जास्त झाल्यास सिग्नल आपोआप थांबतो. समुद्रात १०० कमानींवर उभा असलेला हा पूल अभियांत्रिकीची किमया मानला जातो.

वांद्रे-वरळी सी लिंक : ५.६ किमी लांबीचा हा केबल-स्टेड पूल वांद्रे ते वरळी हे अंतर १० मिनिटांत पार करतो. यामध्ये ५६ हजार हत्तींच्या वजनाइतके स्टील आणि काँक्रीट वापरण्यात आले. १,६०० कोटी खर्चून बांधलेल्या या पुलावर दुचाकी, पादचारी आणि तीन चाकी वाहनांना प्रवेश नाही. पुलाच्या केबल्स एकत्र केल्यास त्यांची लांबी पृथ्वीच्या परिघाएवढी आहे.

राम झुला : उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये गंगा नदीवर बांधलेला राम झुला २२० मीटर लांब आणि २ मीटर रुंद आहे. १९८५ मध्ये याचे बांधकाम सुरू झाले आणि १९८६ मध्ये पूर्ण झाले. हा पुल २१ मीटर उंच टॉवर आणि २४ स्टील केबल्सने आधारलेला आहे. पादचारी आणि दुचाकींसाठी वापरला जाणारा हा पूल पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

टॅग्स :भारतIndia