ऑपरेशन सिंदूरदरम्यान कुणाचं झालं सर्वाधिक नुकसान? अमेरिकन रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 14:20 IST2025-06-11T14:17:30+5:302025-06-11T14:20:08+5:30

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यदलांमध्ये पुढचे दोन तीन दिवस टोकाचा संघर्ष झाला होता. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांच्या सामरिक ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्याच्या परिणामकारतेबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या या संघर्षाबाबत अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या वेबसाईटच्या अहवालामधून धक्क्कादायक माहिती समोर आली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यदलांमध्ये पुढचे दोन तीन दिवस टोकाचा संघर्ष झाला होता. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांच्या सामरिक ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्याच्या परिणामकारतेबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या या संघर्षाबाबत अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या वेबसाईटच्या अहवालामधून धक्क्कादायक माहिती समोर आली आहे.

या रिपोर्ट नुसार भारताने केलेल्या कारवाईदरम्यान, पाकिस्तानकडे असलेली चिनी शस्त्रसामुग्री आणि एअर डिफेन्स सिस्टिम पूर्णपणे अपयशी ठरली. भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या हवाई दलाच्या २० टक्के पायाभूत सुविधा नष्ट झाल्या. तसेच अनेक हवाई तळ निकामी झाले.

टोरांटो येथील कुवा डिफेन्स न्यूज अँड अॅनालिसिस ग्रुपचे संस्थापक बिलाल खान यांनी सांगितले की, पाकिस्तानला चीनकडून मिळालेली एअर डिफेन्स सिस्टिम तितकीशी प्रभावी ठरली नाही. भारतीय हवाई दलाच्या क्षेपणास्त्रांनी एचक्यू-९ आणि एचक्यू-१६ सारख्या चिनी डिफेन्स सिस्टिमला भेदत नियोजित लक्ष्यांना उद्ध्वस्त केले.

अमेरिकेच्या संरक्षण संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या उपग्रहांच्या माध्यमातून काढलेल्या छायाचित्रांमधून भारताने पाकिस्तानमधील नूर खान, भोलारी, मियांवाली, मस्रूरसारख्या प्रमुख हवाई तळांवर हल्ले करून मोठ्या प्रमाणात विद्ध्वंस घडवल्याचे समोर आली. भारताच्या अचूक आणि नियोजनबद्ध हल्ल्यांमुळे पाकिस्तानची महागडी सैनिकी साधनसामुग्री संकटात सापडली, असे न्यूयॉर्क टाइम्स आणि जपान टाइम्सने म्हटले आहे. तर भारताने एक साब-२००० विमान पाडले, ही बाब ऐतिहासिक असल्याचे ब्रम्हा चेलानी यांनी म्हटले.

भारताविरुद्धच्या संघर्षात पाकिस्तानने चिनी शस्त्रास्त्रांवर संरक्षणासाठी विश्वास टाकला होता. त्यात पीएल-१५ई एअर टू एअर क्षेपणास्त्र, एचक्यू-९ एसएएम सिस्टिम आणि सीएम-४०१ हायपरसॉनिक क्षेपणास्त्रावर पाकिस्तानी सैन्य विसंबून होतं. एवढंच नाही तर पाकिस्तानने एकाच रात्री भारताच्या दिशेने ४०० हून अधिक ड्रोन पाठवले होते. मात्र त्यांच्यामुळे भारताची कुठलीही विशेष हानी झाली नाही. भारताच्या संरक्षण यंत्रणांनी वेळीच सतर्क होत पाकिस्तानचे हे हल्ले परतवून लावले होते.

तर भारताच्या संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मेजर जनरल जीडी बख्शी यांनी सांगितले की, भारताची इंटीग्रेटेड एअर डिफेन्स प्रणाली ही अमेरिका इस्राइल आणि रशियाच्या तोडीची आहे. तसेच चिनी तंत्रज्ञानापेक्षा खूप प्रगत आहे. आम्ही पाकिस्तानच्या एअर डिफेन्स प्रमाणील उद्ध्वस्त केले. हा संघर्ष केवळ भारताच्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करणारा नव्हता. तर त्यामुळे चिनी शस्त्रास्त्रांच्या उपयुक्ततेबाबत आणि विश्वसनियतेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.