मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 07:59 PM2020-09-05T19:59:49+5:302020-09-05T20:13:02+5:30

बऱ्याच दिवसांपासून एका पॉलिसीवर चर्चा सुरू होती. मात्र आता, केंद्रातील मोदी सरकार लवकरच ही पॉलिसी घेऊन येत आहे. यानुसार, तुमची गाडी जुनी झाली असेल तर ती सरळ भंगारमध्ये पाठवण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावेडकर यांनी सांगितले, की ही पॉलिसी लवकरच लागू करण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर वाहनांच्या भंगार पॉलिसीचा प्रस्ताव तयार असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे, या प्रस्तावावर सर्व संबंधित पक्षांनी आपले मतही व्यक्त केल्याचे प्रकाश जावेडकर यांनी म्हटले आहे.

यापूर्वी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही म्हटले होते, की सरकार जुनी वाहने भंगारमध्ये पाठवण्यासाठी नवे धोरण अथवा पॉलिसी आणण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत बंदरांच्या जवळ रीसायकलिंग प्लांटदेखील तयार केले जाऊ शकतात.

यावेळी, जुन्या कार, ट्रक आणि बसेसना भंगारमध्ये रुपांतरित केले जाईल, असे गडकरी यांनी म्हणाले होते.

गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने देशातील बंदरांची खोली 18 मीटर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर वाहनांना भंगारमध्ये रुपांतरित करणारे रीसायकलिंग प्लांटदेखील बंदरांच्या जवळ तयार केले जाऊ शकतात.

यातून मिळणारी सामग्री ऑटोमोबाईल उद्योगासाठी वापरली जाईल. कारण यामुळे, कार, बसेस आणि ट्रक यांच्या उत्पादनासाठी येणारा खर्च कमी होईल आणि आंतराष्ट्रीय बाजारात भारताची स्पर्धा वाढेल.

गडकरी यांच्या अंदाजानुसार, आगामी पाच वर्षांच्या आत, भारत सर्व कार, बसेस आणि ट्रक उत्पादनातील पहिल्या क्रमांकाचे केंद्र बनेल.

यात, सर्व प्रकारच्या ईंधनाची, इथेनॉल, मिथेनॉल, बायो-सीएनजी, एलएनजी आणि इलेक्ट्रिक बरोबरच हायड्रोजन ईंधनाची विक्रीही होईल.