कधी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते ज्योतिरादित्य शिंदे; आता गड वाचेल की नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 02:51 PM2023-09-15T14:51:26+5:302023-09-15T14:58:50+5:30

गेल्या काही महिन्यांत शिंदेंचे अनेक खंदे समर्थक पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्यात भाजपच्या दोन नेत्यांची आडकाठी होत आहे.

मध्य प्रदेशमध्ये येत्या काही महिन्यांत निवडणुका लागणार आहेत. काँग्रेसचे आलेले सरकार पाडून भाजपाला सत्तेत बसविणारे आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना खूप धावपळ करावी लागणार आहे. कारण गेल्या काही महिन्यांत शिंदेंचे अनेक खंदे समर्थक पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. यामुळे शिंदेंना आपला गड वाचविणे महत्वाचे ठरणार आहे.

भोपाळमध्ये आजतकच्या एका कार्यक्रमात शिंदे यांना त्यांच्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आले. गेल्या निवडणुकीपासून ते येत्या निवडणुकीपर्यंत शिंदेंनी एका काठावरून दुसरा काठ गाठला आहे, परंतू त्यांच्या सोबतचे साथीदार निसटल्याने आता त्यांचा किल्ला देखील ढासळायला लागला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असताना त्यांना मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदार मानले जायचे. २०१८ मध्ये अखेरच्या क्षणी कमलनाथ आणि दिग्विजय यांनी त्यांचा पत्ता कापला. २०२३ ला ते भाजपाच्या गोटात आहेत. परंतू, शिंदेंना भाजपातूनच आव्हान मिळत आहे. मुख्यमंत्री पदाच्या शक्यतेवर ते काहीच भाष्य करत नाहीएत. या प्रश्नावर ते शिवराज सिंह चौहान यांनी १८ वर्षांत मध्य प्रदेशचा चांगला विकास केला आहे, एवढेच सांगत आहेत.

२०२० मध्ये शिंदेंसोबत जे भाजपात गेले होते, त्यांचा भ्रमनिरास होताना दिसत आहे. जुने भाजपाचे नेते आणि शिंदेंचे समर्थक यांच्यात जुळत नसल्याने ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतत आहेत. गेल्या सहा महिन्यांत जवळपास ४० हून अधिक शिंदे समर्थकांनी शिंदेंची साथ सोडली आहे.

शिंदे जेव्हा भाजपात आले तेव्हा त्यांना केंद्रात मंत्रीपद दिले गेले आणि समर्थक आमदारांना राज्यात मंत्रिपदे देण्यात आली. परंतू, २०२३ मध्ये असे होणार नाहीय. कारण १८ वर्षांनी अनेकजण पहिल्यांदा आमदार झाले होते, त्यांनी शिंदेंसाठी काँग्रेस सोडली होती. ग्वाल्हेर-चंबळ भाग भाजपासाठी अनुकुल नाहीय असे काही सर्व्हेंमध्ये सांगण्यात आले आहे.

शिंदेंचे भाजपात आता कुठे राजकारण सुरु झाले आहे. परंतू, संघ आणि भाजपाने याच राजघराण्याविरोधात प्रचार करत आपली जमिन तयार केली होती. ग्वाल्हेरचे नरेंद्र सिंह तोमर आणि जवळच्या भागातील नरोत्‍तम मिश्रा ही दोन नावे ही मूळ भाजपा, संघाची आहेत. हेच दोन बडे नेते आता शिंदेंची ताकद कमी झाल्याचा फायदा उठवू पाहत आहेत.

काँग्रेसमध्ये असताना जरी शिंदेंचा शब्द चालत होता, तसा आता भाजपात असताना चालत नाहीय. कारण या दोन नेत्यांची जमिनीवरील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठी पकड आहे. भाजपाने जरी म्हटले की शिंदेंना मोठी जबाबदारी देऊ, परंतू स्थानिक लोकांमध्ये शिंदेंबाबत तेवढी उत्सुकता राहिलेली नाही, असे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

आता या सगळ्याला शिंदे कसे टक्कर देतात हे येणारी निवडणूक ठरविणार आहे. गेल्या निवडणुकीत ग्वाल्हेर चंबळमध्ये काँग्रेसला 34 पैकी 26 जागा मिळाल्या होत्या. तेवढ्यात जागा शिंदेंना पुन्हा मिळवायच्या आहेत. तरच भाजपात ज्योतिरादित्य शिंदेंचा पुन्हा दबदबा राहणार आहे.