India China FaceOff: ब्लॅक टॉपसाठी चीनचा आटापिटा; तीन दिवसांत दोनदा घुसखोरीचा प्रयत्न; जाणून घ्या महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 12:58 PM2020-09-02T12:58:50+5:302020-09-02T13:03:36+5:30

चार महिने उलटून गेले तरीही पूर्व लडाखमधील तणाव कायम आहे. या दरम्यान दोनदा भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झाली आहे. तर गेल्या तीन दिवसांत चिनी सैन्यानं दोनदा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे.

१५ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. त्यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं. तर चीनचंही मोठं नुकसान झालं. मात्र चीननं अद्याप मृत सैनिकांचा आकडा जाहीर केलेला नाही.

तीन दिवसांत चिनी सैन्यानं दोनदा घुसखोरीचे प्रयत्न केले. मात्र दोन्ही वेळा भारतीय जवानांनी चीनचे मनसुबे उधळून लावले.

२९-३० ऑगस्टच्या रात्री आणि त्यानंतर पुन्हा ३१ ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्यानं लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनची नजर ब्लॅक टॉपवर आहे.

ब्लॅक टॉपच्या डोंगराळ भागावर भारतानं वर्चस्व मिळवलं आहे. याशिवाय पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याच्या परिसरात भारतीय लष्करानं टी-९० रणगाड्यांची रेजिमेंट तैनात केली आहे.

चीननं याच भागात टी-१५ रणगाडे तैनात केले आहेत. या रणगाड्यांचं वजन कमी असतं. सध्याच्या घडीला चीनचं संपूर्ण लक्ष ब्लॅक टॉपवर आहे.

ब्लॅक टॉपवर चीनचं नियंत्रण आहे. मात्र या भागात भारतीय लष्कराच्या हालचाली वाढल्यानं चीनची अस्वस्थतता वाढली आहे.

ब्लॅक टॉपच्या १०० मीटर उंचीवरून चिनी रणगाडे अगदी सहज दिसतात. चिनी सैन्यानं रणगाडे कारवाईसाठी सज्ज ठेवले आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर एँटी टँक मिसाईल स्पाईक सिस्टमसह तयार आहे.

लडाखमधील चुशूल भाग लष्करी कारवाईसाठी अतिशय अनुकूल आहे. हा भाग सखल असल्यानं लष्करी कारवाई वेगानं केली जाऊ शकते.

चुशूल भागाचा वापर लॉन्च पॅड म्हणून केला जाऊ शकतो. १९६२ मध्ये पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही किनाऱ्यांचा वापर चिनी सैन्यानं केला होता. त्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला होता.