आता थेट अंतराळात खेळ होणार; अमेरिकेमुळे रशिया-चीन नमले, भारताला सुपरपॉवर बनण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 09:35 PM2023-04-06T21:35:20+5:302023-04-06T21:58:19+5:30

जगभरातील अनेक देश अंतराळ व्यवसायात वेगाने पुढे जात आहेत.

जगात अंतराळ व्यवसाय(Space Business) वेगाने वाढत आहे. आतापर्यंत यात चीन आणि रशियाचे वर्चस्व होते. परंतु अलीकडे अशा काही घडामोडी घडल्या, ज्यानंतर भारताला या व्यवसायात आपले अस्तित्व प्रस्थापित करण्याची संधी मिळाली आहे. अमेरिकेने चीन आणि युक्रेन युद्धाच्या तणावामुळे रशियाला कमकुवत केला आहे.

भविष्यातील शक्यता आणि या व्यवसायाची व्याप्ती पाहता भारताला महासत्ता होण्यासाठी हा व्यवसाय उपयुक्त ठरू शकतो. 2020 मध्ये अंतराळ अर्थव्यवस्थेची व्याप्ती $447 अब्ज होती, जी 2025 पर्यंत $600 अब्ज होईल असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत भारत या क्षेत्रात झपाट्याने आपली उपस्थिती वाढवत आहे.

या शर्यतीत इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स हे एक मोठे नाव आहे, जिच्याशी स्पर्धा करण्याची ताकद इस्रोची व्यावसायिक कंपनी न्यूजस्पेस इंडिया लिमिटेडने दाखवली आहे. या कंपनीने नुकतेच यूकेची कंपनी वनवेब लिमिटेडचे ​​तीन उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. अवकाशातून हायस्पीड इंटरनेट देण्याची मागणी वेगाने वाढत आहे, त्यामुळे उपग्रह कक्षेत प्रक्षेपित करण्याचा व्यवसाय वेगाने वाढत आहे.

यूकेची कंपनी वनवेबला जागतिक ब्रॉडबँड इंटरनेट नेटवर्क तयार करायचे आहे. त्यामुळे नुकतेच उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. पण यातून अवकाश व्यवसायातील भारताच्या महत्त्वाकांक्षेचेही संकेत मिळाले आहेत. ही संधी भारतासाठीही मोठी आहे कारण एरियनस्पेस या अवकाश संस्थेला आपले नवीन रॉकेट तयार करण्यात अडचणी येत आहेत.

दुसरीकडे, ब्रिटिश अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांची कंपनी व्हर्जिन ऑर्बिट होल्डिंग्ज लिमिटेडने आपले कामकाज अनिश्चित काळासाठी बंद केले आहे. जानेवारीमध्ये त्यांचे एक लॉन्च अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आता भारताने या क्षेत्रात यश मिळवून आगेकूच केली, तर या बाबतीत त्याचा दबदबा वाढू शकतो.

भारत प्रगती करत आहे, कारण मेक इन इंडिया कार्यक्रमात अंतराळ क्षेत्राचा विकास करण्यावर खूप भर दिला जात आहे. भारताला टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनमध्ये टॉप डेस्टिनेशन बनवण्याचा उद्देश आहे. मात्र, चीनशी स्पर्धा करण्यासाठी भारताला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. कारण 2020 मध्ये पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांमध्ये चीनचा वाटा 13.6 टक्के होता.

या क्षेत्रात भारताचा वाटा फक्त 2.3 टक्के होता. पण भारताइतके स्वस्त तंत्रज्ञान फार कमी देशांकडे आहे. त्यामुळे कमी किमतीमध्ये उपग्रह प्रक्षेपित करुन चीनपासून अंतर राखणाऱ्या देशांना आणि कंपन्यांना आकर्षित करण्याची भारताला मोठी संधी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जगाची नजर आपल्या भारतावर असणार आहे.