Coronavirus: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! लॉकडाऊननंतर सोपा नसणार रेल्वेप्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 07:29 PM2020-04-06T19:29:01+5:302020-04-06T20:12:11+5:30

Coronavirus : रेल्वे प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका हा अधिक असल्याने रेल्वेसेवा बंद करण्यात आली. कोरोनामुळे केंद्र सरकारने पहिल्यांदाच देशात रेल्वेगाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या 4000 हून अधिक झाली आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात.

रेल्वे प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका हा अधिक असल्याने रेल्वेसेवा बंद करण्यात आली. कोरोनामुळे केंद्र सरकारने पहिल्यांदाच देशात रेल्वेगाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने 22 मार्च ते 31 मार्चपर्यंत सर्व रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. मात्र पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यावर रेल्वे प्रशासनानेही मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू असून, त्यातून अत्यावश्यक वस्तूंची ने-आण केली जात आहे. पण पॅसेंजर, एक्स्प्रेस यांपासून उपनगरी गाड्या तसेच मेट्रो रेल्वेही आता बंद आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतर अनेक गोष्टी बदलणार आहेत. रेल्वे प्रवास करताना देखील काळजी घेणं गरजेचं असणार आहे. रेल्वेने प्रवास करताना काय बदल होऊ शकतात हे जाणून घेऊया.

एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सध्या उत्पन्नाचा नाही, तर पूर्णपणे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करीत आहे. कोरोनाचा संसर्ग आणखी पसरत तर नाही ना याची खात्री करणे आवश्यक आहे पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लॉकडाऊननंतर रेल्वेने प्रवास करताना सर्व प्रवाशांना मास्कशिवाय प्रवास न करण्याचे आवाहन केले जाईल. प्रवासादरम्यान मास्क वापरला गेला नाही, तर प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपचा आधार घेत सरकारकडून प्रवाशांच्या तब्येतीची तपासणी केली जाणार आहे, तपासणीत एखादा प्रवासी आजारी असल्याचे आढळले तर त्याला प्रवास करू दिला जाणार नाही.

विमानतळांप्रमाणे रेल्वे प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग तपासणी केली जाते. स्क्रीनिंग केल्याशिवाय कोणत्याही प्रवाशाला ट्रेनमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. या व्यतिरिक्त, प्रवाशांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी इतरही अनेक पर्यायांचा विचार केला जात आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतरही ज्या भागाला कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले गेले असेल त्या स्थानकांवर ट्रेन न थांबवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

लॉकडाऊन संपल्यावर रेल्वे स्थानकांवर लोकांची गर्दी होऊ नये असाच रेल्वेचा प्रयत्न राहणार आहे.

जे लोक प्रवास करणार नाहीत अशा व्यक्तींनी रेल्वे स्थानकात येऊ नये याबाबत काही नियम रेल्वे तयार करू शकते.

कोरोनाशी लढण्यासाठी रेल्वे आपल्या एसी आणि नॉन-एसी कोचचे रुपांतर आता आयसोलेशन वार्डमध्ये करत आहे.

रेल्वे तब्बल 3.2 लाख आयसोलेटेड बेड तयार करत आहे. यासाठी 20 हजार कोचमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहे.