CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' राज्यात अनिश्चित काळापर्यंत 'नाईट कर्फ्यू' लागू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 11:54 AM2021-03-19T11:54:15+5:302021-03-19T12:16:20+5:30

CoronaVirus Marathi News and Live Update : गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. अनेक राज्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,15,14,331 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,59,370 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 39,726 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 154 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील रुग्णसंख्या एक कोटीवर गेली असल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. अनेक राज्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

देशातील अनेक राज्यांमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान आता पंजाबमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संक्रमणाचा वाढता वेग लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी संपूर्ण राज्यात अनिश्चित काळापर्यंत 'नाईट कर्फ्यू' लावण्याची घोषणा केली आहे. हा नाईट कर्फ्यू 9 ते 5 पर्यंत लागू राहील. नाईट कर्फ्यू परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सुरूच राहील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

पंजाबमध्ये 1 ते 17 मार्च दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ झालेली दिसून येत आहे. 1 मार्च रोजी पंजाबमध्ये 500 नवीन रुग्ण आढळले होते तर 17 मार्च रोजी समोर आलेल्या रुग्णांची संख्या तब्बल 2045 वर पोहचली.

राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकड्यातही मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या एका महिन्यात जवळपास 392 जणांना आपला जीव गमवावा लागला आहेत. कोरोना रुग्णसंख्या रेकॉर्ड करताना दिसत आहे.

राज्यात फेब्रुवारी महिन्यात पंजाबमध्ये 8706 रुग्णांची नोंद झाली होती. तर मार्च महिन्यात जवळपास प्रत्येक दिवशी हजारांच्या जवळपास नवीन रुग्ण आढळत आहेत. राज्यातील मृत्यूदर 4.5 टक्क्यांच्या जवळपास आहे.

राज्यात गेल्या आठवड्याभरात 194 मृत्यू तर फेब्रुवारीच्या महिन्यात 217 मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाचा संसर्गे रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महाराष्ट्र, मुंबईची आकडेवारी आता चिंता वाढवणारी ठरत आहे. त्यामुळे मुंबई आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे हे संकेत आहेत. याच दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर 20 मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशात गुरुवारी कोरोनाचे 917 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या आकड्यानंतर राज्यात एकूण कोरोनारुग्णांची संख्या 2 लाख 71 हजार 957 झाली आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रोज हजारोच्या संख्येने रुग्ण वाढत आहे. महाराष्ट्रात झपाट्याने वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत 20 मार्चपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लोक आपल्या खासगी वाहनानं येऊ-जाऊ शकतात.

बसेसवर घालण्यात आलेली बंदी कधीपर्यंत असेल हे परिस्थिती पाहून ठरवण्यात येईल, असं मध्य प्रदेश सरकारकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत.

गुजरामध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने राज्य सरकारने मंगळवारी चार मोठ्या शहरांत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरातमध्ये दिवसाला 800 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 17 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत अहमदाबाद, सूरत, राजकोट आणि वडोदरा या चार मोठ्या शहरांत नाईट कर्फ्यू लागू होणार आहे.

नाईट कर्फ्यू रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या कोर कमिटीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.