CoronaVirus Live Updates : चिंताजनक! देशात पुन्हा एकदा वाढू शकतो कोरोनाचा धोका; आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 05:02 PM2022-04-12T17:02:57+5:302022-04-12T17:21:08+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनाबाबत सुखावणारी आकडेवारी समोर येत आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 796 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (12 एप्रिल ) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 796 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशात आतापर्यंत 5,21,710 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. असं असताना आता पुन्हा एकदा देशात कोरोनाचा धोका वाढण्याची चिन्हे आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टने याबाबत एक इशारा दिला आहे.

गेल्या पाच दिवसांतच संसर्गाचा दर 0.21 टक्क्यांवरून 0.32 टक्क्यांवर पोहोचला आहे. तथापि, दररोजच्या नव्या प्रकरणांचा विचार केल्यास रविवारी 1154 च्या तुलनेत सोमवारी 861 प्रकरणे नोंदविली गेली.

कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11,058 वर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सक्रिय रुग्णांची संख्या 11,058 पर्यंत खाली आली आहे जी एकूण रुग्णांच्या 0.03 टक्के आहे.

गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. रुग्णांचा बरं होण्याचा दर 98.76 टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण 4,25,03,383 लोक संसर्गमुक्त झाले आहेत आणि कोविड-19 मुळे मृत्यूदर 1.21 टक्के आहे.

देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देखील शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून तेथील कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या दैनंदिन नवीन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा संदर्भ देत राजेश भूषण यांनी केरळ, दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा आणि मिझोरामच्या अधिकाऱ्यांना संसर्ग रोखण्यासाठी सतत देखरेख ठेवण्याचे आणि कोरोना व्यवस्थापनासाठी तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन या पाच-सुत्रीय धोरणांचा अवलंब करण्याची गरज आहे, असेही राजेश भूषण म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही कोरोनाच्या नवीन 'XE व्हेरिएंट ' संदर्भात बैठक घेतली. यावेळी कोरोनाच्या प्रकरणांचाही आढावा घेतला आणि कोरोनाचे नवीन व्हेरिएंट्स आणि प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी सुरू असलेली देखरेख आणि पाळत ठेवणारी यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या सूचना मांडविया यांनी दिल्या आहेत.

मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अधिकाऱ्यांना कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधे आणि औषधांच्या उपलब्धतेचा सतत आढावा घेण्यास सांगितले आहे. लसीकरण मोहीम पूर्ण गतीने राबवण्यावर आणि सर्व पात्र लोकांना लसीकरण करण्यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला आहे.