काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 11:23 AM2024-01-01T11:23:13+5:302024-01-01T11:37:19+5:30

Loksabah Seat Sharing Congress: महाराष्ट्रातही काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणावर जागा काढून घेण्याची शक्यता आहे.

लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली तरी भाजपाप्रणित एनडीएविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीमध्ये जागावाटपावरून काही खरे दिसत नाहीय. प्रादेशिक पक्ष विरुद्ध काँग्रेस असा जागावाटपाचा तिढा प्रत्येक राज्यात होताना दिसत आहे. याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीचे जागावाटप १४ जानेवारीपर्यंत होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, त्यापूर्वीच काँग्रेसच्या गोटातून आघाडीतील घटक पक्षांच्या पायाखालची जमिन घसरेल अशी अपडेट येत आहे.

काँग्रेसला बाजुला ठेवून तिसऱ्या आघाडीचे सुरुवातील प्रयत्न झाले होते. शरद पवार, नितीश कुमार आणि इतर मोजक्या नेत्यांनी तशी चाचपणीही केली होती. परंतू, काँग्रेसविरहित आघाडीत तेवढा दम दिसत नसल्याने अखेर काँग्रेसला दबावाखाली ठेवत आघाडीत घेण्याची तयारी सुरु करण्यात आली होती. परंतु, आता काँग्रेसच या नेत्यांना डोईजड ठरताना दिसत आहे.

I.N.D.I.A आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीपूर्वी काँग्रेसने नॅशनल कमिटीची शुक्रवार, शनिवार अशी दोन दिवस मॅरेथॉन बैठक घेतली. यामध्ये पक्षाने आपल्या १० राज्यांतील प्रदेश अध्यक्ष आणि नेत्यांना काँग्रेस २९१ जागांवर एकटी लढणार असल्याचे सांगितले. तसेच आघाडीतील ९ राज्यांमध्ये ८५ जागा मागणार असल्याचेही सांगितले.

काँग्रेसने आघाडीतील मित्रपक्षांसोबत डील करण्यासाठी काही गोष्टी ठरविल्या आहेत. यानुसार ज्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, तिथे समझोता करण्यात येणार नाही. याचसोबत दोन लोकसभा आणि २०१४ नंतरच्या विधानसभांच्या निकालांच्या आधारे काँग्रेस अन्य जागा मागणार आहे.

ईशान्येकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 20 जागा. आंध्र प्रदेश, आसाम, गुजरात, हरियाणा, हिमाचल, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थानमधील सर्व जागा आणि तेलंगणा-उत्तराखंडमधील 22 जागांवर काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या स्थानी होते.

२०१९ मध्ये काँग्रेस ४२१ जागांवर लढली होती. यापैकी ५२ जागा जिंकल्या होत्या, तर २०९ जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळली होती. २०१४ मध्ये काँग्रेस ४६४ जागांवर लढली होती. पैकी ४४ जागा जिंकल्या होत्या व २२४ जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती.

एकट्या लढणाऱ्या जागा काँग्रेसने निश्चित तर केल्याच आहेत परंतू, मित्रपक्षांच्या जागा देखील काँग्रेस खिशात घालण्याचा प्लॅन आखत आहे. यामध्ये बिहार ९, दिल्ली ५, पंजाब ८, तामिळनाडू १०, युपी १०, प. बंगाल 5, जम्मू काश्मीर ३ आणि महाराष्ट्रात २६ जागा मित्रपक्षांकडून काढून घेण्याच्या विचारात काँग्रेस आहे. म्हणजेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून तिढा वाढण्याची शक्यता आहे.

असे असले तरी गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेस यावेळी कमी म्हणजेच ३७५ जागांवर उमेदवार उतरविणार आहे. कमी जागा लढवत असल्याचे दाखवून ज्या जागेवर जिंकण्याची शक्यता अधिक असेल त्या मोक्याच्या जागा काँग्रेस लढविण्याची शक्यता आहे.

म्हणजेच जर एनडीएपेक्षा जास्तीचे बहुमत मिळाले तर काँग्रेसकडे मित्रपक्षांपेक्षा जास्त संख्याबळ असेल, जेणेकरून पंतप्रधान पदासाठी देखील मित्रपक्षातील विरोधकांचा आवाज शिल्लक राहणार नाही, याची काळजी आतापासूनच घेतली जात आहे. या बैठकीती अहवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील रणनिती आखली जाणार आहे.