सीमेवर भारी पडतोय जवानांना 'हा' शत्रू; तोंडावर मास्क घालून करतायेत मुकाबला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 07:44 PM2019-08-21T19:44:54+5:302019-08-21T19:47:43+5:30

भारत-बांग्लादेश सीमेवर बीएसएफ जवानांना एका वेगळ्या शत्रूचा सामना करावा लागत आहे. या शत्रूचा मुकाबला करण्यासाठी भारतीय जवानांना विशेष तयारीही करावी लागतेय. यासाठी जवानांना चेहऱ्यावर मास्क घालावं लागत आहे. याठिकाणी मच्छर चावल्यामुळे जवानांना मलेरियाचा धोका संभावतो.

त्रिपुराच्या सीमेवर बांग्लादेश लागतं. त्याठिकाणी तैनात असलेले जवान मलेरियापासून वाचण्यासाठी अशाप्रकारे मास्क घालून सीमेवर देशाचं रक्षण करतात. जवान संपूर्ण बॉडी यूनिफॉर्म आणि ग्लोव्स हातात घालतात. त्याचसोबत धूर करण्यासाठी एक डीवाइसपण सोबत ठेवतात.

बांग्लादेशच्या सीमेवर सामान्यपणे जवानांना दहशतवादी, घुसखोर, तस्कर यांच्याशी लढावं लागतं. मात्र मच्छरांच्या चाव्याने जवानांना जगणं मुश्किल झालं आहे.

माध्यमांच्या रिपोर्टनुसार काही वर्षापूर्वी बांग्लादेश सीमेवर तैनात अनेक जवानांना मलेरिया झाला होता. त्यात जवानांचा मृत्यूदेखील झाला होता. त्यासाठी सीमेवर तैनात जवानांसाठी विशेष ड्रेस बनविण्यात आला आहे. त्यामुळे मलेरियापासून जवानांचे रक्षण होईल.

त्रिपुरा जिल्ह्यात सर्वाधिक जंगल परिसर आहे. तेथे बीएसएफची ७१ वी बटालियन तैनात आहे. त्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोलिंग करताना जवान मेडिकेटेड नायलॉन नेट परिधान करतात. त्यामुळे मच्छरांपासून त्यांचा बचाव होतो.