राज ठाकरेंना चॅलेंज देणारा दबंग खासदार; 'असा' आहे बृजभूषण सिंह यांचा राजकीय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 02:17 PM2022-05-10T14:17:10+5:302022-05-10T14:21:28+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह हे सध्यात सगळीकडे चर्चेत आहेत. खासदार बृजभूषण सिंह यांनी शक्तिप्रदर्शन करत राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी उघड धमकी दिली आहे.

बृजभूषण सिंह जेलमध्ये असताना खुद्द पंतप्रधानांनी त्यांना पत्र पाठवलं होतं. ३० मे १९९६ रोजी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी बृजभूषण सिंह यांना जेलमध्ये तुम्ही हिंमत ठेवा, लवकरच जामीन मिळेल. वाईट दिवस लवकरच दूर होतील असं म्हटलं होते.

अटल बिहारी वाजपेयी यांचे खूप भावूक आणि खासगी संबंध बृजभूषण सिंह यांच्यासोबत होते. उत्तर प्रदेशात वाजपेयी यांना विजयाची खात्री देणारा एकमेव नेता होतो तो म्हणजे बृजभूषण सिंह. कारण बृजभूषण सिंह यांची ताकद आणि दबंगगिरी ज्यामुळे त्यांना बाहुबली म्हटलं जातं.

१९९१ मध्ये आनंद सिंह यांच्याविरोधात विजय मिळवून बृजभूषण सिंह पहिल्यांदा खासदार झाले. १९९३ मध्ये अयोध्येतील वादग्रस्त ढाचा पाडण्यात आला. त्यात लालकृष्ण अडवाणीसह ज्या ४० जणांना आरोपी करण्यात आले. त्यात बृजभूषण सिंह यांचाही समावेश होता.

१९९२ मध्ये मुंबईत जेजे हॉस्पिटलमध्ये शूटआऊट झाले. त्यात माजी केंद्रीय मंत्री कल्पनाथ राय आणि बृजभूषण सिंह यांना आरोपी बनवण्यात आले. जेजेमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या शूटरला मारलं होतं. ज्याने दाऊदच्या भावोजीची हत्या केली होती. दाऊदच्या शूटर्सला मदत करण्याचा आरोप बृजभूषणवर होता. पण त्यांना क्लीनचीट मिळाली.

बृजभूषण सिंह कॉलेजमध्ये असताना काही मुले रस्त्यातून जाणाऱ्या मुलीची छेड काढत होते तेव्हा त्यांनी त्या मुलांना अद्दल घडवली. तेव्हापासून ते विद्यार्थी नेता म्हणून उदयास आले. पैलवान असलेल्या बृजभूषण सिंह यांना युवकांची साथ लाभली.

१९८८ मध्ये ते भाजपाच्या संपर्कात आले. त्यानंतर हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांनी प्रतिमा बनवली. भाजपामधून पहिल्यांदा विधान परिषदेची निवडणूक लढवली. परंतु १४ मतांनी हरले. मात्र त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही कारण रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.

२००९ मध्ये काही कारणांनी भाजपात वाद होऊन त्यांनी पक्ष सोडला. त्यानंतर समाजवादी पक्षातून लोकसभा निवडणूक लढवली. कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून ते ६३ हजार मतांनी निवडून आले. परंतु सपासोबत त्यांचे वैचारिक मतभेद कायम उघड झाले.

त्यांनंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या ६ महिने आधी बृजभूषण सिंह पुन्हा एकदा भाजपात सहभागी झाले. बृजभूषण सिंह यांचा बाहुबली प्रवास अनेक गंभीर आरोप आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. त्यांच्यावर ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. १९९१ ते २०१९ त्यांनी ६ वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे.

बृजभूषण सिंह यांना लेखन, गायन आणि साहित्य याच्यावर विशेष प्रेम आहे. ते त्यांच्या भाषणात नेहमी कविता, गाणी गाऊन दाखवतात. बृजभूषण सिंह यांना महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्यांच्याकडे सर्वाधिक गाड्यांचे नंबर ९००० असा आहे.