चिखलात रुतली लष्कराची वाहनं, पाण्यात बुडालं शहर, सिक्कीममधील जलप्रलयानंतरचं भयावह चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 04:54 PM2023-10-06T16:54:35+5:302023-10-06T17:01:28+5:30

Sikkim Flood: सिक्कीममध्ये आलेल्या फ्लॅश फ्लडमुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक जण बेपत्ता आहेत.

सिक्कीममध्ये आलेल्या फ्लॅश फ्लडमुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक जण बेपत्ता आहेत. या पुराची तीव्रता एवढी प्रचंड होती की, त्यामध्ये माणसांबरोबरच तीन-चार मजली घरंही वाहून गेली. अनेक इमारतींच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत चिखल जमलेला होता. तो आता बर्फामध्ये रूपांतरीत होत आहे.

ढगफुटीमुळे चुंगथांगमध्ये असलेल्या साऊथ ल्योनक लेकमधील पाण्याची पातळी वाढली. तसेच पाण्याच्या वाढत्या दबावामुळे तलावाची भिंत तुटली. त्यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी आणि चिखल वाहून आला. त्यामुळे नदीच्या किनारी वसलेली अनेक शहरं उद्ध्वस्त झाली. तीस्ता बेसीनमधील गाव आणि वस्त्या गायब झाल्या.

तीस्ता बेसिनमध्ये दिक्चू, सिंग्तम आणि रांग्पो पाण्याखाली आहेत. सिक्कीममधील वेगवेगळ्या भागात ३००० पर्यटक अडकलेले आहेत. आतापर्यंत सुमारे १६६ जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे. यामध्ये काही लष्कराचे जवानही आहेत. चुंगथांगमध्ये उपस्थित असलेल्या तीस्ता स्टेज ३ डॅमच्या बोगद्यांमध्ये अजूनही १२ ते १४ मजूर अडकलेले आहेत. लष्कराच्या गाड्या पुराच्या पाण्यात वाहून चिखलामध्ये कशा काय अडकल्या हे फोटोमध्ये दिसत आहेत.

पुरामुळे ज्या लोकांची घरं नष्ट झाली आहेत. किंवा चिखलामध्ये दबलेले आहेत. त्यांच्यासाठी २५ रिलिफ कॅम्प बनवण्यात आले आहेत. लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सचे जवान लोकांना औषधे, रसद आणि उबदार कपडे पोहोचवत आहेत. कारण चुंगथांग, लाचुंग आणि लाचेनमध्ये शेकडो पर्यटक आणि स्थानिक अडकलेले आहेत. केवळ लष्कराचे जवानच सॅटेलाईट फोनवरून संवाद साधू शकत आहेत.

अनेक ठिकाणचा विज पुरवठा खंडित झालेला आहे. टेलिफोन लाइन तुटलेल्या आहेत. कनेक्टिव्हिटी तुटली आहे. पूर्व लष्करी कमांडच्या ब्रह्मास्त्र कॉर्प्सच्या जवानांनी आतापर्यंत २५० जणांना रेस्क्यू केले आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या आहेत.

येथील लोकांना वाचवणं कठीण बनलं आहे. कारण तिथे सातत्याने चिखलात पडल्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ते उरलेले नाहीत. संचार प्रणाली ठप्प झाली आहे. सुमारे २२ हजार लोक अद्यापही संकटामुळे प्रभावित झालेले आहेत. भारतीय लष्कर आणि एनडीआरएफचे जवान लोकांना वाचवण्यामध्ये गुंतले आहेत.