Vande Bharat Trains : मोदींचा मास्टर प्लान! तब्बल ४०० वंदे भारत ट्रेनची घोषणा होणार, स्लीपर कोचही मिळणार; पहिली बुलेट ट्रेन केव्हा? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 09:06 AM2022-11-26T09:06:24+5:302022-11-26T09:12:47+5:30

मोदी सरकार पुढील अर्थसंकल्पात ३०० ते ४०० वंदे भारत ट्रेनची घोषणा करण्याची शक्यता आहे. पुढील एका वर्षात या सेमी-हाय-स्पीड ट्रेनची पहिली 'स्टँडर्ड गेज' आवृत्ती तयार करण्याचंही रेल्वेचं लक्ष्य आहे. यामुळे २०१५-२६ पर्यंत युरोप, दक्षिण अमेरिका आणि पूर्व आशियाच्या बाजारपेठेत निर्यातीचा मार्ग खुला होईल.

नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा ही पुढील ३ ते ४ वर्षात अशा ४७५ सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्याच्या आधीच घोषीत केलेल्या योजनेव्यतिरिक्त असणार आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि प्रवाशांना चांगला अनुभव देण्यासाठी दरवर्षी अशा ३०० ते ४०० गाड्या मंजूर करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सध्याच्या ट्रॅकवर वेग वाढवण्यासाठी या ट्रेन्सच्या डिझाइनमध्ये सुधारणा करण्याच्या योजनांबद्दल रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार भारताला २०१५-२६ पर्यंत टिल्टिंग तंत्रज्ञानासह ट्रेनचा पहिला सेट मिळेल. आधीच मंजूर असलेल्या ४७५ पैकी सुमारे १०० वंदे भारत ट्रेन या तंत्रज्ञानाचा वापर करतील. त्यामुळे गाड्या अधिक वेगानं वळण्यास मदत होईल.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार स्लीपर कोच असलेली पहिली वंदे भारत ट्रेन २०२४ च्या पहिल्या तिमाहीत सुरू केली जाईल. सध्या या सर्व गाड्या ब्रॉडगेज नेटवर्कसाठी आहेत. मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितले की, “आम्ही अशा ट्रेन्स तयार करू ज्या स्टँडर्ड गेज नेटवर्कवर धावू शकतील. आवश्यक चाचण्या घेण्यासाठी राजस्थानमध्ये २२० किमी प्रतितास वेगाने चाचणीसाठीचा ट्रॅक विकसित केला जात आहे"

येत्या तीन वर्षांत देशात ४७५ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या रुळांवर धावू लागतील, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं होतं. तर देशातील पहिली बुलेट ट्रेन २०२६ पर्यंत सुरू होईल, असंही ते म्हणाले. सध्या देशात पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. त्याची सुरुवात २०१९ मध्ये नवी दिल्ली आणि वाराणसी दरम्यानच्या वंदे भारत एक्स्प्रेसने झाली होती.

नुकतंच अशा तीन नवीन तंत्रज्ञानासह गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्यांचा कमाल वेग ताशी 180 किमी आहे. मात्र सध्या ते ताशी १३० किमी वेगाने चालवल्या जात आहेत. पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प गांधीनगर ते मुंबई दरम्यान बांधला जात आहे. बुलेट ट्रेनचा वेग ३२० किमी प्रतितास असेल.

रेल्वेमंत्र्यांनी 'टाइम्स नाऊ समिट'मध्ये दिलेल्या माहितीनुसार ४७५ वंदे भारत गाड्या चालवण्याचं लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेनं सरकार वाटचाल करत आहे. मागील अर्थसंकल्पात ४०० गाड्यांना मंजुरी देण्यात आली होती आणि त्यापूर्वी ७५ गाड्यांना मंजुरी देण्यात आली होती.

“आम्ही येत्या तीन वर्षांत लक्ष्य गाठू. या ट्रेनमध्ये अनेक देशांनी स्वारस्य दाखवलं आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यात आणखी सुधारणा हवी आहेत, असे त्यांनी नुकतेच सांगितले. त्यामुळे रेल्वे सध्या थर्ड जनरेशन वंदे भारत एक्स्प्रेसच्या डिझाइनवर काम करत आहे", असं अश्विनी वैष्णव म्हणाले.