Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:48 IST2025-06-14T18:44:04+5:302025-06-14T18:48:47+5:30

१२ जून २०२५ रोजी गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे एआय १७१ विमान टेकऑफनंतर काही मिनिटांनीच खाली कोसळले. या अपघातावेळी विमानात २४२ लोक होते, त्यातील केवळ एकमेव प्रवासी जिवंत वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
हे विमान ज्या बी.जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल मेस इमारतीवर कोसळले तिथे घटनेवेळी १०० हून अधिक विद्यार्थी दुपारचे जेवण करत होते. या भयंकर अपघातात विमानातील पायलट, प्रवाशांसह हॉस्टेलमधीलही अनेक लोक मृत पावले. आतापर्यंत यातील मृतांचा आकडा २७० पर्यंत पोहचला आहे.
दुर्घटनेवेळी या विमानात तब्बल सव्वा लाख लीटर इंधन होते. त्यामुळे जेव्हा हे विमान इमारतीला धडकले तेव्हा प्रचंड स्फोट झाला. त्यातून विमानाचे लोखंड, स्टील वितळून गेले. धगधगत्या आगीने संपूर्ण परिसरात काळपट केला. इतक्या भीषण अपघातात सगळे काही राख झाले असताना त्यात एक गोष्ट जळाली नाही, ती म्हणजे विमानातील ब्लॅक बॉक्स
मात्र या ब्लॅक बॉक्ससोबतच आणखी एक गोष्ट आहे जी या आगीत जळाली नाही. देशातील ज्येष्ठ फॉरेन्सिक एक्सपोर्ट डॉ. बी.एन. मिश्रा यांनी एका माध्यमाशी बोलताना याचा खुलासा केला. विमान इमारतीला धडकल्यानंतर त्यातून स्फोट घडला आणि त्या आगीत मानवी शरीराची अक्षरश: राख झाली परंतु एक भाग वाचला, तो कोणता यावर त्यांनी उत्तर दिले.
डॉ. मिश्रा म्हणाले की, ही घटना भयंकर होती. विमानाने उड्डाण घेतले होते, त्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात इंधन होते. टेकऑफनंतर काही सेकंदात विमान इमारतीला धडकले. त्यात भीषण आग लागली. ही आग इतकी जबरदस्त होती की त्यातील मृतदेहाचीही राख झाली. कुठलाही मृतदेह सहजपणे ओळखता येऊ शकत नाही.
या घटनेनंतर प्रशासनाकडून विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांना डिएनए नमुने देण्याचे आवाहन करण्यात आले. डिएनए चाचणी केल्यानंतर मृतदेह संबंधित कुटुंबाकडे सोपवले जातील. या अपघातात मानवी शरीराची राख झाली असली तरी त्यातील एक अवयव म्हणजे दात वाचले आहेत.
एक्सपर्ट सांगतात की, मानवी दातात कॅल्शियम कार्बोनेट आणि फोरफाइडचा समावेश असतो. ते एक हजार डिग्री तापमानातही जळत नाही आणि वितळत नाही. या विमान अपघातातून जे तापमान निर्माण झाले ते १ हजार पार केले नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेत दात एकमेव अवयव आहे जो व्यवस्थित राहिला.
आता या विमान दुर्घटनेतील मृतदेहांची ओळख त्यांच्या दातानेच पटवली जाणार आहे. कुटुंबाने दिलेल्या नमुन्यानंतर ते डिएनए मॅच होतील तेव्हा मृतदेह सोपवले जातील. त्यामुळे अहमदाबाद दुर्घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांना डिएनए चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे. इथे हॉस्पिटलबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.
अहमदाबाद बीजे मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत २३० हून अधिक डिएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळख डिएनए चाचणीवरून करण्यात येणार आहे. या चाचणीच्या मदतीने पूर्वंज, वंशज यांच्याबाबत अचूक माहिती मिळते. मानवी शरीरात अनेक सेल्स असतात. त्यात Red Blood Cells, White Blood Cells यात ब्लड सॅम्पल छोट्या छोट्या तुकड्यात तपासले जाते.
कोर्ट किंवा सरकारी आदेशावरच डिएनए चाचणी केली जाते. या टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी १ आठवड्याचा कालावधी लागतो. सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, लखनौ, नोएडासारख्या ठिकाणी डिएनए चाचणी केंद्र आहेत.