एक चूक महागात पडेल, घर कायद्याने भाडेकरूच्या मालकीचे होईल; सर्वोच्च न्यायालयही मदत करू शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 03:00 PM2023-04-16T15:00:00+5:302023-04-16T15:07:35+5:30

सध्याच्या काळात एवढे सोपे नसले तरी ते अशक्य नाहीय. सर्वोच्च न्यायालयाने स्वत: या प्रकरणात भाडेकरूच्या बाजुने निकाल दिलेला आहे.

अनेकजण आपली संपत्ती भाड्याने देतात. अनेकदा त्यासाठी करारही केला जातो. तो कधी ११ महिन्यांचा कधी दोन, पाच वर्षांचा असतो. परंतू, जर एका गोष्टीची काळजी घेतली नाही तर तुमची ती संपत्ती कधी भाडेकरूच्या मालकीची होऊन गेली हे तुम्हाला कळणारही नाही. महत्वाचे म्हणजे न्यायालयही यात तुम्हाला मदत करू शकणार नाही. यामुळे घर असेल की जागा भाड्याने देताना या गोष्टीची काळजी जरूर घ्या.

याला प्रतिकूल ताबा असे म्हटले जाते. हे सध्याच्या काळात एवढे सोपे नसले तरी ते अशक्य नाहीय. सर्वोच्च न्यायालयाने स्वत: या प्रकरणात भाडेकरूच्या बाजुने निकाल दिलेला आहे. जर एखादा व्यक्ती कोणत्याही खासगी संपत्तीमध्ये सलग १२ वर्षे राहत असेल तर ती त्याचीच होऊन जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

हा कायदा इंग्रजांच्या काळापासूनचा आहे. सरळ शब्दांत बोलायचे झाले तर हा कायदा अवैध कब्जाचा आहे. वर दिलेल्या परिस्थितीत हे मान्य केले जाते. परंतू, १२ वर्षांच्या रहिवासाचा कायदा सरकारी मालमत्तांसाठी लागू होत नाही. या कायद्याचा वापर अनेकदा भाडेकरुंनी केलेला आहे. यामुळे घरमालकांना त्यांचे घर, मालमत्ता गमावण्याची वेळ आली आहे.

जर मालमत्तेचा ताबा शांततेने घेतला असेल आणि जमीनमालकालाही याची माहिती असेल तर मालमत्तेच्या मालकीवर प्रतिकूल ताब्याचा दावा केला जाऊ शकतो. या १२ वर्षांच्या काळात एकच गोष्ट घरमालकाला त्याची संपत्ती परत मिळवून देऊ शकते.

12 वर्षांच्या कालावधीत जमीन मालकाने त्या ताब्याबाबत कोणताही आक्षेप किंवा बंधन घातलेले नसावे. म्हणजेच भाडेकरू त्या घरात सातत्याने कोणताही खंड न पडता राहत होता, हे भाडेकरूला सिद्ध करावे लागणार आहे. असे न झाल्यास ते घर घरमालकाचेच राहणार आहे.

भाडेकरूने घरावर ताबा मागताना प्रॉपर्टी डीड, कर पावती, वीज किंवा पाण्याचे बिल भरल्याचे पुरावे व साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र इत्यादी देखील सादर करणे आवश्यक आहेत.

घरमालकाने या परिस्थितीतून सुटण्यासाठी घर देण्यापूर्वी भाडेकरार बनवून घ्यावा. कमीतकमी ११ महिने ते पुढे चार-पाच वर्षे. परंतू तो १२ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिकचा नसावा. भाडेकरार रिन्यू केला की तो घरावरील भाडेकरुच्या ताब्याला ब्रेक मानला जातो.

याचबरोबर दुसरी एक काळजी म्हणजे, तुम्ही काही काही कालावधीने भाडेकरू बदलू शकता. तसेच वारंवार मालमत्तेचे निरीक्षण करावे, जेणेकरून अवैध कब्जा केलेला लक्षात येईल. कोणाच्या तरी विश्वासावर मालमत्ता अशीच सोडून देणे नुकसानीचे ठरू शकते.