By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:25 IST
1 / 10भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यावर तथाकथित तांत्रिक तसेच भोंदूबाबांकडून झालेल्या फसवणुकीची चर्चा रंगली असून दैवी शक्ती, कोपाची भीती दाखवून अब्रूवर घाला घालणं, आर्थिक पिळवणूक करणे यासारखे प्रकार भोंदूबाबांकडून होत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.2 / 10गुप्तधन मिळेल, आयुष्यात प्रगती होईल किंवा अपत्यप्राप्ती होईल, आर्थिक अडचणीतून बाहेर याल, पतीला नोकरी लागेल, मनासारखा पती मिळेल हे प्रश्न घेऊन भोंदू अशोक खराकडे जाणाऱ्या महिलांची संख्या ८० टक्के होती असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.3 / 10व्यापाऱ्यात प्रगती होत नाही, नोकरीत प्रमोशन हवं, राजकरणात महत्त्वाचे पद कधी मिळेल, उमेदवारी मिळविण्यासाठी उपाय हे प्रश्न घेऊन व्यापारी, उच्च पदस्थ अधिकारी, राजकीय मंडळी भोंदू खरातच्या पायऱ्या झिझवत असत. 'भोंदू' संस्कृतीने जिल्ह्याभरात पाच वर्षात २० च्यावर पीडित फसले असून, त्यात महिलांचाही समावेश आहे.4 / 10महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरुद्ध 'जादूटोणाविरोधी कायदा २०१३' लागू होऊनही भोंदूबाबा, मांत्रिकांकडून नागरिकांची फसवणूक थांबलेली नाही. आर्थिक लुटीसह महिलांच्या शारीरिक शोषणाचेही प्रमाण अधिक आहे.5 / 10इतर भोंदूबाबा किंवा मांत्रिकांची फसवणुकीची पद्धत देखील अशोक खरात करीत असे जवळपास तशीच असते. आशेने अनेकजण भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकतात. आकर्षक आश्वासनं देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. अशाप्रकारे बुवाबाजीमधून लोकांची मानसिक व आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढत आहेत.6 / 10दैवीशक्तीचा कोप होईल, अपाय होईल, पतीचं निधन होईल अशी भीती दाखवून भोंदूबाबा आणि मांत्रिक लोकांना जाळ्यात ओढतात. काही प्रकरणांमध्ये महिलांची अब्रू धोक्यात येते. अंधश्रद्धेचा फायदा घेत मानसिक दबाव टाकून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याची बाब चिंताजनक आहे.7 / 10जादूटोणा, तंत्रमंत्राच्या नावाखाली लोकांना घाबरवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. अडचणी दूर होतील असे सांगून भोंदू लोक पीडितांना फसवतात. अनेकवेळा लोक भीतीपोटी विरोध करत नाहीत. समाजात बदनामी होईल किवा भीती वाटते म्हणून ते शांत राहतात.8 / 10अटकेत असलेल्या अशोक खरातबाबत तक्रार करण्यासाठी एसआयटीने हेल्पलाइन नंबर दिला आहे, मात्र २० टक्के पीडितांनी पथकाकडे लेखी तक्रारी दिल्या नाहीत. तर त्यांनी प्रत्यक्ष समोर न येता फक्त हेल्पलाइनवर आमची फसवणूक कशी झाली याची आपबिती सांगितली आहे. मात्र अशामुळेच भोंदूबाबांची हिमंत वाढते, असे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.9 / 10भोंदूबाबांच्या जाळ्यात केवळ अशिक्षितच नाही, तर उच्चशिक्षित लोकही मोठ्या प्रमाणात अडकत असल्याचे अशोक खरात प्रकरणावरून दिसतं. करिअर, आरोग्य किंवा वैयक्तिक समस्यांमुळे ते अशा लोकांवर विश्वास ठेवतात. शिक्षण असूनही अंधश्रद्धा कायम असल्याचं हे चित्र समाजासाठी धोकादायक ठरत आहे.10 / 10वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मानसिकता घट्ट करावी. पैसे, संपत्ती याच्या मोहातून बाहेर पडावं. मन शांतीसाठी नामस्मरण, प्रार्थना, उपासना याचा अंगीकार करावा. झटपट श्रीमंत होण्यासाठी मांत्रिक, भोंदूच्या पायऱ्या चढू नये.