लहान मुलांमध्ये राग का वाढतोय?; 'ही' कारणे वाचा आणि पालकांनो स्वत:मध्ये बदल करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 10:33 AM2023-12-05T10:33:01+5:302023-12-05T10:36:58+5:30

गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये राग येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणजे त्यांचे आईवडील यांना उद्धट बोलणे, त्यांच्यावर लहानसहान गोष्टीला घेऊन चिडचिड व्यक्त करणे. त्यांनी सांगितलेले काम व्यवस्थित न ऐकणे आणि स्वतःच्या मनाला वाटेल त्या चुकीच्या गोष्टी करणे. या प्रकारची काही लक्षणे लहान मुलांमध्ये दिसून येत आहेत.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते टाइम स्क्रीनमध्ये झालेली वाढ, संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे नात्यामध्ये झालेला दुरावा आणि पालक आईवडील त्यांच्या नोकरीमध्ये व्यस्त असल्यामुळे दुरावलेला संवाद, शैक्षणिक ताण, शाळेमधील चिडविणे त्याचप्रमाणे भीतीदायक पुस्तक वाचणे किंवा चित्रपट पाहणे या काहीशा गोष्टी लहान मुलांमधील येणाऱ्या रागाला कारणीभूत ठरत असतात.

गेल्या काही महिन्यांत मोबाइलचा वापर वाढला आहे. तर काही मुलांची सोशल मीडियावर खाती उघडण्यात आले आहे. त्यामध्ये सतत ही मुले आपल्या व इतरांच्या पाेस्टला किती लाईक आल्या याची तुलना करत बसतात.

अनेकजण कुटुंबातील आईवडील कामावर असतात. त्यामुळे मुलांचा आणि पालकांचा संवाद दुरावण्याची शक्यता असते. ज्यावेळी बोलायचे असते त्यावेळी त्यांना जवळची व्यक्ती मिळत नाही.

पाल्याला चांगले शिक्षण, पोषण मिळण्यासाठी आईवडील दोघेही नोकरी करतात. नोकरीत स्वतःला गुंतवून घेतात की संध्याकाळी घरी आल्यावर पालकांना मुलांशी गप्पा मारायला वेळ नसताे.

आमच्या घरात आजीआजोबा, काकाकाकी, भावाची मुले एकत्र आहेत. माझी बायकोसुद्धा त्यांची काळजी घेण्याकरिता घरी असते. मात्र हल्ली काही मुले राग व्यक्त करतात, हट्ट धरतात. आम्ही त्यांना समजून सांगण्याचा कायमच प्रयत्न करत असतो.- रोहित उगले, पालक

आम्ही नवराबायको नोकरी करतो. कायम मुलीच्या नात्यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. आम्ही रोज संध्याकाळी तिच्याशी गप्पा मारतो. माझी पत्नी मुलीचा दैनंदिन अभ्यास घेत असते. त्यामुळे तिच्या अभ्यासाकडे लक्ष असते. मात्र हल्लीची काही मुले चिडचिडे असतात. - सागर सानप, पालक

सध्या एक आणि दोन मुले असतात. त्यामुळे या मुलांना लहानपणापासून नाही ऐकायची सवय नसते. त्यांना एखादी गोष्टी नाही सांगितली की त्यांची चिडचिड होते. मोठ्या प्रमाणात मुलांचे हल्ली लाड केले जातात. त्यामुळे त्यांना पालक चिडतात ही गोष्ट आवडत नाही. काही वेळा पालकांचा संवाद अपुरा पडतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये चिडचिड वाढली आहे. - डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ