Tata Airbus किती महत्त्वाचा होता? महाराष्ट्राने किती रोजगार आणि गुंतवणूक गमावली? तुम्हीच पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 02:19 PM2022-10-28T14:19:23+5:302022-10-28T14:23:48+5:30

Tata Airbus Project: टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचे रोजगार आणि गुंतवणुकीच्या बाबतीत मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

Tata Airbus Project: उद्योग आणि प्रकल्पाच्या बाबतीत महाराष्ट्राला आणखी एक धक्का बसला आहे. नागपूर येथे साकारण्यात येणारा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरून आता राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता.

आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी त्याचे भूमिपूजन करणार आहेत. या घोषणेमुळे महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भ विकासाच्या स्वप्नांना धक्का बसला आहे.

वायुसेनेसाठी सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनविण्याची जबाबदारी टाटा एअरबसला सोपविली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता तर राज्यात तब्बल २२ हजार कोटीची आर्थिक गुंतवणूक झाली असती. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या तरुणवर्गाला मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असता.

टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला जाणे, ही महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारसाठी मोठी नामुष्की ठरल्याचा आरोप करण्यात येत आहे. गत सप्टेंबर महिन्यात भारताने एअरबसशी सी-२९५ विमानांच्या निर्मितीसाठी २१ हजार ९३५ कोटींचा कोटींचा सामंजस्य करार केला होता. भारतीय हवाई दलातील जुन्या झालेल्या AVRO-७४८ या विमानांची जागा सी-२९५ विमाने घेणार आहेत.

एअरबस डिफेन्स अँड स्पेस (स्पेन) २०२३ पर्यंत भारतीय हवाईदलाला १६ विमाने तयार करुन देणार आहे. तर उर्वरित ४० विमानांची निर्मिती ही बडोदा येथील टाटा-एअरबस प्रकल्पात केली जाईल. बडोद्यातील कारखान्यात तयार होणारी ही विमान भारतीय हवाईदलातील सध्याच्या AVRO-७४७ या विमानांची जागा घेतील. हा प्रकल्प केवळ या ४० विमानांपुरताच मर्यादित नाही.

भविष्यात गुजरातमधील टाटा-एअरबस प्रकल्पात भारतीय लष्कर आणि नागरी उड्डाणांसाठी लागणाऱ्या विमानांची निर्मिती केली जाईल. यापैकी काही विमानांची निर्यात करण्याचीही योजना आहे. सी-२९५ ही विमाने भारतीय हवाईदलासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.

ही विमाने ९ टनापर्यंतचे वजन वाहून नेऊ शकतात. एकावेळी या विमानातून ७१ जवान किंवा ४४ पॅराट्रुपर्स प्रवास करु शकतात. सी-२९५ हे विमान कमी जागेत टेक-ऑफ किंवा लँडिंग करु शकते. डोंगराळ भागातही हे विमान लँड करता येऊ शकते. टाटा-एअरबस प्रकल्पामुळे गुजरातमध्ये मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

बडोद्यातील प्लांटमध्ये पूर्णपणे स्वदेशी एअरक्राफ्ट तयार होईल. विमानांचा पुरवठा २०२६ ते २०३१ पर्यंत केला जाईल. पहिली १६ विमाने २०२३ ते २०२५ दरम्यान येतील. २०२१ च्या सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस डिफेन्स अॅण्ड स्पेससोबत सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या करारावर सही केली.

एअरबस चार वर्षांत स्पेनमध्ये अंतिम असेंब्ली लाइनपासून पलाय अवे स्थितीत पहिली १६ विमाने देईल. त्यानंतर ४० विमाने भारतात टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स (टीएएसएल) द्वारा निर्मित व असेंबल केले जातील, अशी काही या टाटा एअरबस प्रकल्पाची वैशिष्ट्ये सांगितली जात आहे.