ना दबाव, ना कुणाची भीती; महिलांना ऑनलाइन तक्रार करणे झाले सोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 20:20 IST2026-03-17T19:54:53+5:302026-03-17T20:20:13+5:30

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. महिलांवरील वाढते अत्याचार आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 'महिला सन्मान पोर्टल' आणि 'सायबर वेलनेस सेल'चे लोकार्पण करण्यात आले. आता पीडित महिलांना पोलिस ठाण्याची पायरी न चढता थेट घरबसल्या आपली तक्रार नोंदवता येणार असून, त्यांना पूर्णतः तांत्रिक व कायदेशीर संरक्षण दिले जाणार आहे.

सायबर वेलनेस सेल तांत्रिक व कायदेशीर सुरक्षा देणार - ब्लॅकमेलिंग, मॉफिंग आणि सोशल मीडियावरील छळवणूक थांबवण्यासाठी 'सायबर वेलनेस सेल' काम करणार आहे. हा सेल पीडित महिलांना तज्ज्ञांकडून तांत्रिक सल्ला आणि कायदेशीर मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देईल.

दाखल तक्रारींवर तातडीने कार्यवाही होणार - केवळ तक्रार नोंदवून हे पोर्टल थांबणार नाही, तर त्यावर 'फास्ट ट्रॅक' पद्धतीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत ठराविक कालमर्यादित प्राथमिक तपास पूर्ण करण्याचे बंधन पोलिसांवर असणार आहे.

तक्रारींची सद्यःस्थिती पाहता येणार - तक्रार दाखल केल्यानंतर त्यावर काय कारवाई झाली? तपास कुठपर्यंत आला? याची संपूर्ण माहिती तक्रारदार महिलेला पोर्टलवर मिळेल. प्रत्येक तक्रारीला एक युनिक आयडी दिला जाईल, ज्याद्वारे प्रगतीचा आढावा घेता येईल.

कुठे आणि कशी दाखल करायची तक्रार ? - शासनाच्या अधिकृत 'महिला सन्मान' पोर्टलला भेट द्या. आपला मोबाइल क्रमांक वापरून लॉग-इन करा. गुन्ह्याचा प्रकार, वेळ आणि ठिकाण याची थोडक्यात माहिती भरा. फोटो किंवा व्हिडिओ असल्यास ते अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांशी पोर्टल कनेक्ट - हे पोर्टल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आणि विभागातील पोलिस ठाण्यांशी मध्यवर्ती यंत्रणेद्वारे जोडलेले आहे. एखादी तक्रार प्राप्त होताच, ती संबंधित पोलिस ठाण्याला आपोआप वर्ग केली जाईल.

महिला सन्मान पोर्टलची सुविधा - राज्य शासनाने विकसित केलेले 'महिला सन्मान पोर्टल' हे केवळ तक्रार निवारण केंद्र नसून महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. या पोर्टलमुळे तक्रार नोंदवताना येणारा सामाजिक दबाव आणि भीती दूर होण्यास मदत होणार आहे.

घरबसल्या नोंदवता येईल तक्रार - अनेकदा पोलिस ठाण्यात जाण्याच्या संकोचामुळे महिला गुन्ह्यांविरुद्ध आवाज उठवत नाहीत. मात्र, या सुविधेमुळे आता कोणत्याही वेळी, कोठूनही मोबाइल किंवा संगणकाच्या साहाय्याने ऑनलाइन तक्रार नोंदवणे शक्य झाले आहे.

गुन्ह्यांचा वाढता आलेख - काही वर्षात सायबर गुन्ह्यांच्या आणि घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने उचललेले हे पाऊल महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.