कोंडा नाही, ही टाळूवर बुरशी; दुर्लक्ष कराल तर होईल टक्कल; काय आहे निदान आणि उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 19:02 IST2026-02-12T18:56:31+5:302026-02-12T19:02:39+5:30

उष्ण कटिबंधीय प्रदेशात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गाचा सामना करावा लागतो. त्यातून अनेक वेगवेगळे आजार देखील घेऊन येतो ही बाब अजिबात दुर्लक्ष करण्याजोगी नसते, लहान मुलांमध्ये जास्त आढळतो. टाळूवर होणारा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे 'टिनिया कॅपिटिस'. त्याला सामान्यपणे स्कॅल्प रिंगवर्म असेही संबोधले जात असून, हा आजार मुख्यतः डर्माटोफाईट्स या बुरशीमुळे होतो. टिनिया कॅपिटिस हा टाळू आणि केसांच्या मुळांना होणारा एक अत्यंत संसर्गजन्य बुरशीजन्य आजार आहे. त्यामध्ये टाळूवर खाज सुटणारे, खवलेयुक्त, लाल वर्तुळाकार चट्टे पडतात, केस गळतात. विशेषत्वे बालवयातही केसांच्या मुळाशी खवलेयुक्त चट्टे पडल्यास मुलांना ते कळतही नाही आणि त्याचे गांभीर्यही लक्षात येत नाही.

ही आहेत प्रमुख लक्षणे - टाळूवर गोल आकाराचे ठिपके पडून केस मुळापासून तुटतात, टाळूवर प्रचंड खाज सुटणे, टाळूवर कोंड्यासारखे पांढरे खवले दिसणे आणि खवलेयुक्त त्वचा वाढणे, काही प्रकरणांमध्ये, वेदनादायक पू-भरलेले फोड किंवा गाठी येतात, ज्यामुळे कायमचे केस गळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खाज सुरू झाल्यापासून ही लक्षणे समजून घेऊन वेळीच दक्षता घेणे आवश्यक ठरते.

संसर्ग असा पसरतो - हा बुरशीजन्य संसर्ग खूप वेगाने पसरू शकतो. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, संक्रमित व्यक्तीचे कंगवा, ब्रश, टॉवेल, उशी किंवा टोपी वापरल्यासदेखील हा संसर्ग होण्याची शक्यता असते. संक्रमित पाळीव प्राणी अर्थात मांजर, कुत्रा यांना आजार असल्यास त्यांच्यापासून कुणालाही हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निदान आणि उपचार - डॉक्टर शारीरिक तपासणी करून, तसेच टाळूच्या त्वचेचा किंवा केसांचा नमुना घेऊन बुरशीची तपासणी करतात. त्यावर उपचारासाठी तोंडावाटे घ्यायची बुरशीविरोधी औषधे आणि डोक्यावर विशिष्ट शॅम्पू वापरले जातात. त्या उपचारांच्या आधारे बुरशी नष्ट करणे शक्य असते. मात्र, औषधोपचार पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा संसर्ग पुन्हा होऊ शकतो.

मुलांना इतरांचे कंगवे, टोपी किंवा टॉवेल शेअर करण्यास मनाई करावी. आर्द्रता व दमटपणामध्ये वाढ झाल्याने बुरशीजन्य संसर्ग खूप वाढतात. त्यामुळे मान्सून काळात आर्द्रतेमध्ये होणारी वाढ बुरशीच्या वाढीसाठी आणि प्रसारासाठी कारणीभूत ठरत असल्याने त्या काळात अधिक दक्षता घ्यावी लागते.