'या' माणसामुळे सरकार अडचणीत येईल असं मी स्वत: शरद पवारांना सांगितलं होतं; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 04:52 PM2023-04-14T16:52:50+5:302023-04-14T16:56:10+5:30

मविआ सरकारच्या काळात सचिन वाझे प्रकरण खूप गाजले. या प्रकरणी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारची कोंडी केली होती. वाझेला पोलीस खात्यात घेण्याचा आग्रह शिवसेनेचाच होता असा आरोप करण्यात आला.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडली. त्यानंतर या प्रकरण वाहन चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळतो. त्यानंतर तपासात सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव पुढे येते त्यावरून महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता.

या सचिन वाझेला पुन्हा पोलीस खात्यात कुणी घेतले याचा खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. परंतु वाझेला घेण्याचा आग्रह उद्धव ठाकरेंचा होता का? असा प्रश्न पत्रकारांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारला

त्यावर संजय राऊत म्हणाले की, मला वाझेबद्दल माहिती नाही. जेव्हा मला कळाले वाझेला नोकरीत घेतले. तेव्हा मी पहिला माणूस जो शरद पवारांना भेटलो, हा चुकीचा माणूस आहे. हा निर्णय आपल्याला थांबवायला हवा असं त्यांना सांगितले.

सचिन वाझेमध्ये सरकारला अडचणीत आणण्याची क्षमता आहे. यात काहीतरी गडबड आहे. माझ्यासोबत २ आमदार होते. पवारसाहेब तुम्ही हस्तक्षेप करा, या माणसामुळे भविष्यात आपले सरकार अडचणीत येईल असं मी बोललो होतो असं संजय राऊत यांनी सांगितले.

त्याचसोबत सचिन वाझेला मी गेले ३० वर्ष ओळखतो. महाविकास आघाडी म्हणून मी शरद पवारांच्या कानावर ही गोष्ट घातली होती. मला कळाल्यानंतर २४ तासांत पवारांना कळवले. त्याला कुणी घ्यायला सांगितले ते मला माहिती नाही. कारण या प्रशासकीय गोष्टी आहेत. माझा याच्याशी संबंध नाही असं राऊतांनी स्पष्ट केले.

सचिन वाझे प्रकरणी जेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने आरोप होत होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेची पाठराखण करत वाझे हे लादेन आहेत का असा प्रश्न विरोधकांना केला होता.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवणे, मनसुख हिरेन हत्या या प्रकरणात सचिन वाझे आरोपी आहे. जेव्हा आरोपपत्र दाखल झाले तेव्हा वाझेचे सरकारकडून निलंबन करण्यात आले. परंतु याचा फटका महाविकास आघाडी सरकारला बसला होता.

कारण वाझे याने अटक झाल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेट १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. वाझेच्या आरोपामुळे राज्यात खळबळ माजली होती. पोलीस दलावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

तर सचिन वाझेला तेव्हाचे पोलीस आयुक्त परमजीत सिंह यांनीच कामावर घेतला. अंबानीच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यामागे मास्टरमाईंडही परमजीत सिंह असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.