coronavirus: अमरावती पॅटर्न वापरणार, ठाकरे सरकार कोरोनाला रोखणार; नेमका काय आहे हा पॅटर्न जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 02:32 PM2021-04-13T14:32:32+5:302021-04-13T14:39:52+5:30

coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अमरावती पॅटर्न वापरण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. लॉकडाऊनबाबतचा हा अमरावती पॅटर्न नेमका काय आहे, याचा घेतलेला हा आढावा.

महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव नियंत्रणाबाहेर जात असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक लॉकडाऊन करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससह विविध घटकांशी चर्चा करून लॉकडाऊनबाबत चाचपणी केली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अमरावती पॅटर्न वापरण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. लॉकडाऊनबाबतचा हा अमरावती पॅटर्न नेमका काय आहे, याचा घेतलेला हा आढावा.

राज्य सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, जर संपूर्ण राज्यामध्ये अमरावती मॉडेलचा वापर केला तर महाराष्ट्रात वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाला रोखता येऊ शकेल.

अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रचंड वेगाने कोरोनाचा फैलाव झाला होता. येथे जानेवारी महिन्याक ३०० ते ५०० अॅक्टिव्ह रुग्ण होते. मात्र ३ फेब्रुवारी रोजी ५०६ अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत गेली. २६ फेब्रुवारीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या १२ पटीने वाढून ६ हजार ७४० वर पोहोचली.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वप्रथम १८ फेब्रुवारी रोजी विकेंड लॉकडाऊन लावले. हा प्रयत्न अपयशी ठरला. २४ फेब्रुवारीपर्यंत २७१० नवे अॅक्टिव्ह रुग्ण सापडले. विकेंड लॉकडाऊनदरम्यान बाजार, सार्वजनिक टिकाणे बंद ठेवण्यात आली. आत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. तर धार्मिक कार्यासाठी पाच जणांची संख्या मर्यादित करण्यात आली.

दरम्यान, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी २२ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान, कठोर लॉकडाऊन लावण्यात आला. त्यानंतर त्याची मुदत ८ मार्चपर्यंत वाढवण्यात आली. याचा मुख्य हेतू लोकांना गोळा होऊन गर्दी करण्यापासून रोखण्याचा होता. यादरम्यान, केवळ अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांना सकाळी ९ ते संध्याकाली ५ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली. शाळा, कोचिंग क्लासेस आणि अन्य सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली. सर्व सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले.

जिल्ह्यामधील सरकारी ऑफिस आणि बँका १५ टक्के उपस्थितीसह उघडण्याची परवानगी देण्यात आली. ट्रान्सपोर्टला लॉकडाऊनमधून बाहेर ठेवण्यात आले. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स यांना केवळ पॅक केलेले भोजन विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे लॉकडाऊन यशस्वी ठरले आणि संसर्गाची साखळी तुटली.

अमरातवती जिल्ह्यात २४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या ४.५६ टक्क्यांनी घटली. त्यानंतर पुढच्या काही आठवड्यांपर्यंत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांच्या संख्येतही घट झाली. ३ मार्च ते ३१ मार्च पर्यंत सक्रीय रुग्णांच्या संख्येत १०.८ टक्क्यांची घट झाली. त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये २९.७ टक्के एवढ्या मोठ्या प्रमामात सक्रिय रुग्णांची संख्या घटली.

३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९६ टक्के होता. तर मृत्यूदर हा १.८ टक्के होता. २६ फेब्रुवारी रोजी रिकव्हरी रेट घटून ७९.१ टक्क्यांवर आला. त्यानंतर लॉकडाऊन लावल्यावर रिकव्हरी रेट वाढण्यास सुरुवात झाली. सध्या तो ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. अमरावती जिल्ह्या लावण्यात आलेले लॉकडाऊन ८ मार्च रोजी संपले. कोरोनाच्या संसर्गाची संख्या घटल्यानंतर हे लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला.

Read in English