मानलं गड्या! पार्ट टाईम जॉब म्हणून मास्तरानं सुरू केली शेती अन् आता घेतोय १ कोटींची कमाई

By manali.bagul | Published: October 29, 2020 01:03 PM2020-10-29T13:03:05+5:302020-10-29T13:41:14+5:30

सध्याच्या काळातील तरूण हे शेतीकडे आकर्षित होताना दिसून येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांची नोकरी गेली. म्हणून पैसे मिळवण्यासाठी तरूणांनी गावाची वाट धरून शेती करायला सुरूवात केली. गेल्या सहा महिन्यात अशी अनेक उदाहरणं तुम्हाला दिसून आली असतील. आज आम्ही तुम्हाला एका तरूण शिक्षकाची प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहोत.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील दौलतपूर गावातील या अवलियाचे नाव अमरेंद्र प्रताप सिंह आहे. अमरेंद्र एका सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी करत असून त्यांनी पार्ट टाईम शेती करायला सुरू केली. विशेष म्हणजे अमरेंद्र यांनी इंटरनेटवरून उत्तम शेती करण्यासाठी अनेक गोष्टी शिकून घेतल्या. बेटर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या शेतीच्या कामातून अमरेंद्र वर्षाला ३० लाख रुपये नफा कमवत आहेत.

अमरेंद्र यांनी सांगितले की, २०१४ मध्ये त्यांनी शाळेच्या सुट्टीत ३० एकर जमिनीत शेती करण्याचे ठरवले. युट्यूबवर अधुनिक शेतीचे तंत्र शिकून घेण्यासाठी व्हिडीओज पाहिले आणि ऑनलाईन ट्यूटोरिअल्समध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी एक एकर जमिनीत केळ्याची शेती केली. इतकंच नाही तर त्यानंतर हळूहळू वेगवेगळी पीकं घ्यायला सुरूवात केली. या पिकांमध्ये हळद, आलं, फूलकोबी या पिकांचाही समावेश होता. हळदीच्या पिकातून त्यांनी खूप पैसे कमावले त्यानंतर पुन्हा हे पैसे शेतीचा व्यवसाय वाढवण्यासाठी गुंतवले.

सुरूवातील अमरेंद्र यांना नुकसानाचा सामना करावा लागला होता. पण त्यांनी हार मानली नाही. सध्या त्यांनी परत १० एकर जमीन विकत घेतली आहे. त्यात त्यांनी धणे, लसूण, मक्का यांची शेती केली. संपूर्ण जमिनीवर शेती करून त्यांनी वर्षभरात जवळपास १ कोटींचे उत्पन्न घेतले आहे. दरवर्षी जवळपास ३० लाखांपेक्षा जास्त नफा ते या शेतीच्या कामातून मिळवतात.

अमरेंद्र यांचे यश पाहून अनेक शेतकऱ्यांनी पारंपारीक शेतीकडून अधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. ३५० शेतकरी अमरेंद्र यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे. त्यांच्या मित्रांनीही या अधुनिक पद्धतींचा अवलंब करून शेती करण्याचं ठरवलं आहे..

अमरेंद्र यांनी सांगितले की, जेव्हा मला शेतीचं जास्त काम असतं तेव्हा मी सुट्टी घेतो. पण आतापर्यंत नोकरी सोडण्याचा विचार केलेला नाही. एकाचवेळी दोन दगडांवर उभं राहून यशस्वी होणारे अमरेंद्र अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. गावातील अनेक शेतकऱ्यांनी अमरेंद्र यांच्याप्रमाणे शेती करण्याचा विचार केला आहे. (Image Credit- thebetterindia)

Read in English