सौदी अरेबिया उभारणार स्वप्नातले शहर; वाळवंटात मिळेल गोवा-मालदीवची फिलींग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 05:10 PM2023-11-08T17:10:19+5:302023-11-08T17:15:39+5:30

Marafy City: सौदी अरेबिया 'द लाइन सिटी' नंतर आणखी एक मेगासिटी उभारत आहे.

Saudi Marafy City: आखाती देशांमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नाहीत, त्यामुळे तिथे पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असतो. तरीदेखील युएई आणि सौदी अरेबियासारख्या देशांनी खूप प्रगती केली आहे. सौदी पाण्यावर नवे शहर उभारत आहे. तसेच, आता आणखी एक मोठी घोषणा केली आहे. सौदीने आणखी एक मेगासिटी बांधण्याची घोषणा केली आहे.

'मराफी' नावाचे हे शहर अमेरिकेतील शहरांप्रमाणे अतिशय प्रगत असेल. जेद्दाहजवळ हे नवीन शहर वसवले जात आहे. या शहरात 1.30 लाख लोक राहू शकतील. शहर उभारण्याची जबाबदारी रोशन ग्रुपकडे देण्यात आली आहे.

यापूर्वी सौदी अरेबियाने निओम प्रकल्पाची घोषणा केली होती. त्याअंतर्गत शहराचा विकास करण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत बांधलेल्या शहराला 'द लाइन सिटी' नाव देण्यात आले आहे. आता सौदी अरेबियात मराफीसारखे शहर बांधले जात आहे.

सौदी अरेबिया पर्यटन उद्योगाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळेच हे नवीन शहर उभारले जात आहे. हे शहर जेद्दाहच्या वाळवंटात बांधले जाईल. हे सौदी अरेबियाचे दुसरे नियोजित भविष्यकालीन शहर असेल.

पर्यटकांना आकर्षित करणारे हे शहर असेल, असा दावा केला जातोय. 7 मैल लांबीचा कालवा वाळवंटातून जाईल. त्याची रुंदी 100 मीटर असेल. भव्य उद्यानामुळे या ठिकाणच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

अल-अरेबियाच्या वृत्तानुसार, या मेगासिटीच्या स्थापनेमागचा उद्देश, समुद्रासारखे वातावरण तयार करणे आहे. या प्रकल्पामुळे जेद्दाहची ओळख जागतिक स्तरावर बदलेल. मराफी आणि निओम प्रकल्प सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला चालना देतील.

याठिकाणी 11 किलोमीटर लांबीचा कालवा बांधण्यात येणार असून, हा देशातील असा पहिलाच कालवा असेल. शहराच्या मध्यभागी पाण्याच्या माध्यमातून सागरी जीवसृष्टीचा विकास करण्यात येणार आहे.

येथे बांधण्यात येणारा वॉटरफ्रंट शिकागो, स्टॉकहोम आणि सेंट्रल लंडनमधील वॉटरफ्रंटसारखा भव्य असेल. हे शहर वॉटर टॅक्सी, बस आणि भुयारी मार्गाने जोडले जाईल.

ROSHN ग्रुपचे ग्रुप सीईओ डेव्हिड ग्रोव्हर म्हणतात, “मराफी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट क्षेत्रात गेम चेंजर ठरेल. विकासाच्या दृष्टीने नवा इतिहास रचला जाईल. दर्जेदार जीवनाला चालना मिळेल. देशाला समृद्ध अर्थव्यवस्था बनवण्याचे व्हिजन 2030 चे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे."