आशेचा किरण! कोरोनाविरोधातील अँटीबॉडीजबाबत मोठा दिलासा, रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 11:08 AM2020-12-28T11:08:43+5:302020-12-28T11:20:06+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: शरीरात अँटीबॉडीज किती वेळ राहतात याबाबत अद्याप कोणताही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र आता एका रिसर्चमधून याबाबत दिलासादायक माहिती मिळत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून रुग्णांचा आकडा 1,02,07,871 वर पोहोचला आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,47,901 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20,021 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 279 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान कोरोनाबाबत संशोधनातून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

कोरोना लसीची विविध टप्प्यातील चाचणी सुरू असून अनेक ठिकाणी त्याला यश येत आहे. तसेच कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडीज कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्यापासून बचाव करतात असं म्हटलं जातं.

शरीरात अँटीबॉडीज किती वेळ राहतात याबाबत अद्याप कोणताही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र आता एका रिसर्चमधून याबाबत दिलासादायक माहिती मिळत आहे.

ऑस्ट्रेलियातील मोनॅश युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या एका टीमने याबाबत रिसर्च केला असून कोरोना व्हायरसचा संसर्ग एकदा होऊन गेल्यावर तयार होणारी इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारकशक्ती किमान 8 महिने टिकून राहते असं म्हटलं आहे.

मोनॅश युनिव्हर्सिटीतील इम्युनॉलॉजिस्ट मेनो वाल जेल्म यांनी दिलेल्या माहितीनुसार, "इम्युनिटीबाबतचा आमचा रिसर्च हा आशेचा किरण ठरणार आहे. रोगप्रतिकारकशक्ती काही महिने असणार आहे"

संशोधकांनी प्रतिकार यंत्रणेमधील मेमरी बी सेल्सवर रिसर्च केला आहे. संशोधन करण्यात आलं. शरीरात झालेला कोणताही संसर्ग लक्षात ठेवण्याची क्षमता या पेशींमध्ये असते. जर पुन्हा एकदा संसर्ग झाला, तर MBC या त्यांच्या मेमरीद्वारे प्रोटेक्टिव इम्यून रिस्पॉन्स देतात.

संशोधकांनी 25 कोरोनाग्रस्त रुग्णांची यासाठी मदत घेतली. कोरोनाच्या संक्रमणाच्या चौथ्या दिवसापासून ते 242 दिवसांपर्यंत रुग्णांच्या रक्ताचे 36 नमुने घेतले.

रिसर्चमध्ये 20 दिवसांनंतर अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर त्या किमान 8 महिने टिकून राहतात असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.