पाकिस्तानमध्ये निकालानंतर गृहयुद्ध; लष्कर प्रमुखांची खेळी, आणखी एक बांगलादेश होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 04:10 PM2024-02-09T16:10:32+5:302024-02-09T16:22:29+5:30

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इमरान खान यांच्या पीटीआयच्या समर्थकांनी सर्वांनाच चकित केले आहे. इमरान खान यांच्या समर्थकांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून नेत्रदीपक यश मिळवले आहे. १०० हून अधिक जागांवर अपक्ष उमेदवार आपली जादू दाखवत आहेत. आता कोणतेही सरकार या अपक्ष खासदारांच्या मदतीनेच स्थापन होणार असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.

त्याचवेळी निवडणूक निकाल आपल्या बाजूने जात नसल्याचे पाहून पाकिस्तानी लष्कर नवाझ शरीफ किंवा बिलावल यांच्या पक्षाला पुढे आणण्यासाठी हेराफेरी करतायेत असा आरोपही केला जात आहे. याचे उदाहरण म्हणजे नवाझ शरीफ, जे रात्रीपर्यंत ७० टक्के मतमोजणी झाल्यानंतर पीटीआयच्या उमेदवाराच्या मागे होते, पण आता त्यांना अचानक लाहोरच्या जागेवरून विजयी घोषित करण्यात आले आहे. यामुळे आता पाकिस्तानी मतदारांमध्ये संताप आणि निराशा पसरत आहे.

या संतापाचे रुपांतर गृहयुद्धासारख्या स्थितीत होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पाकिस्तानी घडामोडींचे तज्ज्ञ आणि ब्रिटनमधील सहाय्यक प्राध्यापक जोहा वसीम यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानमध्ये निवडणूक निकाल जाहीर होण्यास एवढा मोठा विलंब झाल्यामुळे हेराफेरीबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात.

एका वृत्तावाहिनीशी बोलताना ते म्हणाले की हे असामान्य आहे आणि पडद्यामागील गडबडीकडे बोट दाखवते. गेल्या काही आठवड्यांपासून नवाझ शरीफ सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत होते पण आता त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पाकिस्तानी सैन्याने इमरान समर्थकांवर दडपशाहीचं तंत्र वापरणं सुरू केले आणि त्यांच्यावर छळ केला जात आहे. आता त्यांच्या या कारवाईचे उलटे पडसाद उमटले, मला वाटत नाही की नवाझ शरीफ किंवा त्यांच्या पक्षाने ही अपेक्षा केली असेल. यामुळेच ते रात्रीपासून शांत होते.

शरीफ यांना आपल्या विजयाची खात्री होती मात्र मतदारांना त्यांना नाकारल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी एका महत्त्वाच्या रणनीतीवर काम केले आहे. असीम मुनीर यांनी अतिशय हुशारीने ब्रिटिशांप्रमाणे फूट पाडा आणि राज्य करा ही रणनीती वापरली आहे असं आणखी एका विश्लेषकाचे म्हणणे आहे.

या निवडणुकीत केवळ एकाच पक्षाची बाजू न घेता त्यांनी अनेक 'गॉसिपर्स' तयार केले आहेत. आता असा प्रत्येक नेता लष्करप्रमुखांसाठी गुप्तहेर म्हणून यांच्यासाठी काम करेल. यामुळे जो पंतप्रधान होईल तो कमकुवत होईल आणि लष्करप्रमुखांकडे पूर्ण अधिकार असेल.

अंतिम निकालात इमरान यांच्या पक्षाच्या विजयाशिवाय दुसरे काही असेल तर ते पीटीआय स्वीकारणार नाही. पीटीआय निकालात हेराफेरी झाली असं म्हणेल. लष्कर इमरान खानला सत्ता देऊ इच्छित नाही आणि या संपूर्ण प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहे असं पाकिस्तानी घडामोडींचे तज्ज्ञ मायकल कुगेलमन म्हणतात.

ते म्हणाले की, या निवडणुकीचा निकाल काहीही असो, देशात स्थैर्य आणण्याऐवजी ते पाकिस्तानला नव्या राजकीय संकटात ढकलू शकतात. त्यामुळे आधीच प्रचंड असलेली समाजातील दरी आणखी वाढेल. यामुळे नवीन कायदेशीर लढाई सुरू होऊ शकते आणि सार्वजनिक बंड भडकवण्याचा धोका संभवतो.

यामध्ये एक धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. लष्कर अपक्ष पीटीआय खासदारांना पुढील ३ दिवसांत कोणत्याही पक्षात जाण्यास भाग पाडू शकते. मग ते नवाझ शरीफ यांचा पक्ष असो वा बिलावल यांचा पक्ष