शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:35 IST2026-04-09T17:19:46+5:302026-04-09T17:35:47+5:30
Strait of Hormuz Closed Again: अथक प्रयत्नांनंतर युद्ध थांबवण्याच्या दिशेने पडलेल्या पहिल्याच पावलानंतर इस्रायलने खोडा घातला. इस्रायलने लेबनानवर हल्ले केले आणि इराणने होर्मुझ बंद करत खिंडीत गाठले.

इराण-अमेरिकेमध्ये शस्त्रसंधी होण्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की, होर्मुझ सामुद्रधुनी तत्काळ खुली करावी. पण, शस्त्रसंधी झाल्यापासून खरंच जहाजांचा ये-जा वाढली आहे का? जगातील २० टक्के तेल-गॅस निर्यात होणारा हा मार्ग टप्प झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेलाच झटका बसला आहे. याच थेट परिणाम झालेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

इराण-अमेरिका शस्त्रसंधी झाली. त्यामुळे तणाव निवळेल आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल, अशीच अपेक्षा असतानाच उलट घडले. याला कारणीभूत ठरले इस्रायलचे लेबनानवरील हल्ले. शस्त्रसंधीनंतर होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाही. ये-जा करणाऱ्या जहाजांची संख्या खूपच कमी आहे.

जहाजांची संख्या का वाढू शकली नाही, याचेही कारण समोर आले आहे. समुद्री वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी सांगितले की, आधी जहाज कंपन्यांना याची माहिती हवी आहे की, होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्यासाठी कोणत्या अटी आहेत? आणि होर्मुझ सुरक्षित पार करण्याची हमी मिळणार का, पण ही कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

शस्त्रसंधीनंतर होर्मुझ सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण, इराणने बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे सामुद्रधुनीतील परिस्थिती बदललेली नाहीये. जहाजांवरील कर्मचाऱ्यांना या मार्गाने प्रवास करणे सुरक्षित वाटत नाहीये.

बीबीसी वृत्तसंस्थेने शिप ब्रोकर एसएसवायच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, खाडीमध्ये असलेल्या जहाजांना इराणच्या आयआरजीसीकडून मेसेज दिला गेला. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद होणं भारताची चिंता वाढवणार आहे. कारण भारतातील तेल-गॅस आयातीवर याचा थेट परिणाम होणार आहे.

या मेसेजमध्ये म्हटले गेले आहे की, "सर्व जहाजांनी या सूचनेकडे लक्ष द्यावे. सर्व जहाजांनी लक्ष द्यावे. फारसच्या खाडीत आणि ओमानच्या खाडीमध्ये असलेल्या सगळ्या जहाजांनी लक्ष द्या. आयआरजीसी नौदल स्टेशनमधून ही सूचना दिली जात आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून ये-जा करणे आता बंद आहे आणि होर्मुझ पार करण्यासाठी आधी आयआरजीसीची परवानगी घ्यावी लागेल. कोणत्याही जहाजे समुद्रात पुढे येण्याचा प्रयत्न केला, तर त्यावर हल्ला केला जाईल आणि नष्ट केले जाईल."

















