Afghanistan Taliban Crisis:...म्हणून अफगाणी लोकांमध्ये तालिबानींची दहशत; शरिया कायदा म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 12:03 PM2021-08-19T12:03:21+5:302021-08-19T12:13:39+5:30

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर अनेकजण देश सोडून इतरत्र जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

अफगाणिस्तान(Afghanistan) मध्ये तालिबान(Taliban) जोपर्यंत नवीन सरकारची स्थापना करत नाहीत तोवर एक काऊन्सिल संपूर्ण देश चालवणार आहे. तालिबानी सध्या अफगाणिस्तानमधील नेत्यांची, सैन्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.

रॉयटर्सनुसार, तालिबानी नेत्याने सांगितले की, ते सर्व नेत्यांशी, अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यानंतर नवीन सरकारची स्थापना केली जाईल. परंतु एक गोष्ट नक्की ती म्हणजे अफगाणिस्तानात लोकशाही नसणार आहे. लोकशाही पद्धतीने देश चालणार नाही त्यामुळे अफगाणिस्तानात शरिया कायदा लागू होणार हे स्पष्ट आहे.

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यापासून तेथील लोकं देश सोडून पळत आहेत. काबुल एअरपोर्टवरील विदारक स्थिती जगानं पाहिली आहे. विमानात अक्षरश: जीव धोक्यात घालून ते घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण विमानावर चढून बसत आहे. लोकांच्या मनात तालिबानची इतकी दहशत आहे की, ते अफगाणिस्तानात थांबायला तयार नाहीत.

तालिबानची अफगाणिस्तानात सत्ता आल्यानंतर शरिया कायदा लागू होईल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे महिला आणि मुलांच्या भविष्याचा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. इस्लामिक शरिया कायदा म्हणजे नेमकं काय? हे साध्या आणि सोप्प्या भाषेत आपण समजून घेऊया.

अलीकडेच तालिबानच्या प्रवक्त्यांनी आमच्या नवीन सरकारमध्ये महिलांचा समावेश असेल असं म्हटलं आहे. परंतु हा शरिया कायद्यात राहून महिलांना नोकरी किंवा शिक्षण घेतल्यास त्यात हरकत नाही. मुस्लीम कायद्यात महिलांना जितकं स्वातंत्र्य दिलं आहे तितकंच मिळेल असं त्यांनी स्पष्ट केले.

शरिया कायदा म्हणजे मुस्लीम धर्मग्रंथ कुराण आणि धर्मगुरुंनी प्रत्येकवेळी काढलेले फतवे यातून हा कायदा निर्माण झाला आहे. शरिया शब्दाचा अर्थ स्वच्छ आखलेला रस्ता असा आहे. शरिया कायदा म्हणजे तुम्हाला आखून दिलेल्या कायद्यानेच तुमचं जीवन जगायचं आहे.

शरिया कायद्यात सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यात जन्म, मृत्यू, लग्न, प्रार्थना, उपवास, दानधर्म यांचा समावेश आहे. तुमच्या रोजच्या नित्यनियमातील दिनक्रमाबाबत शरिया कायद्यात काही मार्गदर्शक तत्त्वं असतात त्याचं पालन करून तुम्हाला आयुष्य जगायचं असतं.

शरिया कायद्याचा मुस्लीम धर्मीयांवर खूप प्रभाव आहे. एखादी गोष्ट करायची की नाही याबाबतही अनेक मुस्लीम शरिया कायद्याप्रमाणे धर्मगुरुंना विचारुन सल्ला घेतात. अनेक कट्टर मुस्लीम शरिया कायद्याप्रमाणे जीवन जगतात. तर अनेकांनी काही प्रथा कालबाह्य असल्याचं सांगत त्याला विरोध केला आहे.

शरिया कायद्यात पूर्वीपासून चालत आलेल्या रुढी परंपरेबद्दल भाष्य केले आहे. त्यात अनेक वर्ष बदल केला नाही. परंतु मुस्लीम धर्मगुरु शरिया कायद्याचं सक्तीनं पालन करण्यासाठी अनेकांवर दबाव टाकतात. इतकचं नाही तर जर कुणी हा कायदा मोडला तर त्याला कठोर शिक्षा दिली जाते.

मुस्लीम पुरुषांनी दाढी राखणे, मुस्लीम वेश परिधान करणं, महिलांनी घराबाहेर पडताना बुरखा घालणं, घरातील पुरुष नसताना एकटं घराबाहेर पडण्यासही महिलांना बंदी आहे. सिनेमा पाहणे, सामाजिक कार्यक्रम, वयाच्या १३ व्या वर्षी मुलींचे शिक्षण बंद करणे अशी कडक निर्बंध शरिया कायद्यात आहेत.

चोरी, अंमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी, बलात्कार, अपहरण, धर्माप्रमाणे न वागणे यासारखे गुन्हे आहेत त्याला हद म्हणतात. जर तुम्ही यापैकी एखादा गुन्हा केला तर अवयव कापणे, भरवस्तीत चाबकाचे फटके, जाहीर मृत्यूदंड आणि दगडाने ठेचून मारणे अशी क्रूर शिक्षा दिली जाते.

अनेक मुस्लीम देशात शरिया कायदा अस्तित्वात आहे परंतु त्याची अंमलबजावणी तेथील धर्मगुरूंवर अवलंबून आहे. पाकिस्तानात कराची लाहोरसारख्या शहरात मुली बुरखा न घालता शिक्षण नोकरी करतात तर दुबईतही त्यांचे मुस्लीम कायदे सौम्य आहेत.