Afghanistan Crisis: महिलांचा आदर करु म्हणणाऱ्या तालिबान्यांनी दोन दिवसांत दाखवले रंग; फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 03:00 PM2021-08-19T15:00:58+5:302021-08-19T15:04:54+5:30

Afghanistan Crisis: महिलांच्या हक्कांचा आदर करु, असं म्हणत अफगाणिस्तान इस्लाम धर्माच्या चौकटीत चालेल," असं तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्लाह मुजाहीद यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं.

आमच्या समाज वर्तुळात महिलांचा सक्रिय सहभाग आम्हाला हवा आहे. आमच्या चौकटीत राहून महिलांनी नोकरी किंवा शिक्षण घेतलं तर आमची मनाई नाही. मुस्लीम कायद्यात महिलांना जेवढं स्वातंत्र्य आहे, तेवढं त्यांना मिळेल. महिलांच्या हक्कांचा आदर करु, असं म्हणत अफगाणिस्तान इस्लाम धर्माच्या चौकटीत चालेल," असं तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्लाह मुजाहीद यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. मात्र दोन दिवसांतच तालिबान्यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे.

काबुलमधील शर-ए-नॉ येथील ब्यूटी सलूनबाहेरचे महिलांचे स्प्रे-पेंट केलेले फोटो हटवण्यात आले आहेत. या संदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एका मीडिया आउटलेटने ट्विट केलेल्या फोटोमध्ये तालिबानचा एक कार्यकर्ता रायफलसह सलूनच्या भिंतींवर असलेले फोटो रंगवून मिटवताना दिसतोय. तालिबानने १५ ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा मिळवला. त्यानंतर तालिबान्यांनी भिंतींवर रंगवलेली महिलांची अनेक छायाचित्रे रंगवून हटवल्याचे फोटो समोर आले आहेत.

लग्नाच्या कपड्यांच्या जाहीरातींमधील स्त्रियांना पांढऱ्या रंगाने रंगवून मिटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यापैकीच एक फोटो बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीदेखील ट्विट केला होता. त्यामध्ये “तालिबान अफगाणी महिलांना नष्ट करत आहेत. यापुढे तिथं कुठेही महिला दिसणार नाहीत. महिला केवळ लैंगिक गुलाम आणि मूल जन्माला घालणारी मशीन म्हणून घरीच राहतील.

कट्टरतावादी तालिबानच्या राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होईल,”असं मत नासरीन यांनी व्यक्त केलं होतं. दरम्यान, जगभरातून अफगाणी महिलांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील महिलांचे हक्क हिरावले जातील, असं म्हटलं जातंय.

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान क्रूरता दाखवणार नाही असा दावा करत आहे, पण हळुहळू त्याचे वास्तव आता समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल होत आहेत, ज्यात तालिबानी दहशतवादी अफगाणी नागरिकांना चाबकांनी मारहाण करत आहेत. तसेच, अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचलेल्या लोकांना विमानतळात प्रवेश न देता त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले जात आहेत.

अफगाणिस्तानाततालिबानची सत्ता आल्यापासून जनतेत प्रचंड दहशत आहे. लाखो लोकांना देश सोडायचा आहे. तालिबाननं अफगाणी नागरिकांना सुरक्षेचं वचन दिलं आहे. मात्र नागरिकांचा त्यांच्या शब्दावर विश्वास नाही. कोणत्याही मार्गानं देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू आहे. काबुलच्या विमानतळावरील गर्दी कायम आहे. दिवसागणिक गर्दी वाढत आहे.

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने भारतातून आयात आणि निर्यातीवर बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) चे महासंचालक डॉ.अजय सहाय यांच्या मते, तालिबानने सध्या पाकिस्तानच्या पारगमन मार्गांवरून सर्व माल वाहतुकीवर बंदी घातली आहे. डॉ. सहाय म्हणाले की, भारत अफगाणिस्तानला साखर, औषधी, चहा, कॉफी, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवर निर्यात करतो. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून सुकामेवा आणि कांदा यासारख्या वस्तू आयात केल्या जातात.